• Tue. Jun 16th, 2026
    काळा कोट घालून पैसे वसूल करत होता, प्रवाशांच्या सतर्कतेने पोलिसांनी बेड्याच ठोकल्या, भलतंच सत्य समोर

    | Contributed byआशिष मोरे | | Updated: 29 Jan 2025, 10:21 am

    Nagpur News : बऱ्याचदा कारवाईच्या भीतीने नागरिक स्वतःला सरकारी अधिकारी भासवणाऱ्या भामट्यांच्या जाळ्यात अडकतात. आणि याच भीतीचा फायदा घेत नागरिकांना लुटलं जातं. परंतु अशावेळी घाबरुन न जाता, शंका वाटल्यास अधिकाऱ्यांचं ओळखपत्र बघणं किंवा संबंधित विभागाला माहिती देणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    जितेंद्र खापरे, नागपूर: बिलासपूर-बीकानेर एक्सप्रेस (गाडी क्र. 20845) मध्ये प्रवाशांकडून तिकिट तपासणीच्या बहाण्याने पैसे वसूल करणाऱ्या एका तोतया टीटीईला नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव संयोग कुमार साहू असून तो रायपूर येथील रहिवासी आहे. नागपूर रेल्वे पोलिसांनी तत्परतेने या आरोपीला पकडून रायपूर स्टेशनवर जीआरपीएफच्या ताब्यात दिले आहे. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

    या घटनेचा उलगडा प्रवाशांच्या सतर्कतेमुळे शक्य झाला. संयोग कुमार साहूने काळा कोट घालून रेल्वेची बनावट आयडी तयार केली होती. प्रथमदर्शनी तो रेल्वेचा टीटीई दिसत होता, त्यामुळे अनेक प्रवाशांनी त्याला ओळखले नाही. मात्र त्याच्या संशयास्पद वर्तनामुळे काही प्रवाशांना शंका आली आणि त्यांनी रेल्वे कर्मचार्‍यांकडे तक्रार केली. कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन त्याच्या चौकशी केली, ज्यामध्ये त्याने आपली ओळख खुली केली. आणि तो एक बनावट टीटीई असल्याचे कबूल केले.

    या घटनानंतर रेल्वे कर्मचार्‍यांनी नागपूर रेल्वे मंडळाच्या सुरक्षा टीमला माहिती दिली. सुरक्षा टीम घटनास्थळी पोहोचून संयोग कुमार साहूला ताब्यात घेतले. आणि त्याला रायपूर स्टेशनवर जीआरपीएफच्या ताब्यात सोपवले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध त्वरित कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

    बऱ्याचदा कारवाईच्या भीतीने नागरिक स्वतःला सरकारी अधिकारी भासवणाऱ्या भामट्यांच्या जाळ्यात अडकतात. आणि याच भीतीचा फायदा घेत नागरिकांना लुटलं जातं. परंतु अशावेळी घाबरुन न जाता, शंका वाटल्यास अधिकाऱ्यांचं ओळखपत्र बघणं किंवा संबंधित विभागाला माहिती देणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे.

    दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांनी या घटनेला पाठिंबा दिला असून, सतर्क रेल्वे कर्मचार्‍यांचा गौरव केला आहे. त्यांनी सांगितले की, या कर्मचार्‍यांनी प्रवाशांच्या सुरक्षा आणि रेल्वेच्या कार्यप्रणालीच्या विश्वासार्हतेचे रक्षण केले आहे. ही घटना रेल्वेतील सुरक्षा व्यवस्था आणि प्रवाशांच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक गंभीर प्रश्न उपस्थित करते. भविष्यात अशा बनावट टीटीईंविरुद्ध कडक कारवाई केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed