• Tue. Aug 11th, 2026

    युवाशक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 11, 2026

    पुणे, दि. ११ : युवाशक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्गावर आयोजित भव्य तिरंगा रॅलीला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार रवींद्र चव्हाण, उमा खापरे, अमित गोरखे, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल, शंकर जगताप  आदी उपस्थित होते.

    ‘इस तिरंगे को हम कभी झुकने नहीं देंगे’ हे सांगण्यासाठी तरुणाई आज तिरंगा हाती घेऊन रस्त्यावर आल्याचे सांगून देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या संदेशानुसार १५ ऑगस्टपर्यंत देशाच्या प्रत्येक शहरात, गावात आपली राष्ट्रभक्ती प्रगट करण्याकरता तिरंगा झेंडा हातामध्ये घ्यावा आणि तिरंग्याची शान दाखवून द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

    मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, तिरंगा हा केवळ झेंडा नसून देशभक्तीचे प्रतीक आहे. तिरंगा आपल्या मनात आणि जीवनात आहे. तिरंगा हाती घेतला तर आपल्याला केवळ आपले अधिकार नाही तर कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात. ज्या संविधानाने अधिकार दिले त्याच संविधानाने आपल्यावर काही कर्तव्ये  पार पाडण्याची जबाबदारीदेखील टाकली आहेत. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही ते म्हणाले.

    प्रधानमंत्री मोदींनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकसित महाराष्ट्र उभा करायचा आहे. पुणे महाराष्ट्राची विद्यानगरी, महाराष्ट्राची नवोन्मेषाची नगरी तसेच महाराष्ट्राची उद्योग नगरी आहे. पुण्यनगरी भारताचं एक सांस्कृतिक बलस्थान आहे. या पुण्याच्या युवाशक्तीच्या भरोशावर उद्याचा भारत आपण पाहणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    तिरंग्याच्या सन्मानासाठी अनेकांनी आपले प्राण दिले, तिरंगा आणि देशासाठी अनेक सैनिक प्राण देतात. हा तिरंगा हाती घेतल्यावर आपल्यावर देशसेवेची जबाबदारी आहे, याचे स्मरण मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना करून दिले. ललित चौक येथून रॅलीला प्रारंभ झाला आणि फर्ग्युसन महाविद्यालय मार्गाने पुढे जात छत्रपती संभाजी महाराज चौकात रालीचा समारोप झाला. यावेळी दुतर्फा उभे राहून नागरिक, विद्यार्थी वंदे मातरम्, भारत माता की जय आदी घोषणा दिल्या. रॅलीत लोकप्रतिनिधी, नागरिक, महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    00000

    महात्मा गांधी विद्यालय नूतनीकरण आणि डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल उभारणीचा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून आढावा – महासंवाद
    महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed