Nanded Food Poisoning: माहूरला दर्शनाला गेलेल्या भाविकांना भगर आणि शेंगदाण्याच्या आमटीतून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे.
ठाकूर बुवा यात्रेसाठी माहूरहून भाविक पोहोचले
तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरात दरवर्षी षट्टतीला एकादशी निमित्त ठाकूर बुवा यांची यात्रा भरली जाते. त्या यात्रेसाठी महाराष्ट्रातील अनेक पायी दिंड्या माहूरमध्ये दाखल होतात. मोकळ्या जागेत, विविध मठात आणि शहरातील मंदिर परिसरात तातपुरत्या राहुट्या उभारल्या जातात. २४ जानेवारी २०२५ रोजी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा (बु) येथील दिंडी देवदेवेश्वर परिसरात दाखल झाली होती. २५ जानेवारीला दिवसभर देवदर्शन केल्यानंतर भाविकांनी रात्री भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ली. रात्री २ वाजेच्या सुमारास काही भाविकांना मळमळ, उल्ट्या होऊ लागल्या. त्यानंतर अनेकांना असाच त्रास होऊ लागला.
भाविकांना उलटी आणि मळमळचा त्रास, चौघांची प्रकृती गंभीर
त्यानंतर या सर्व रुग्णांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला काही रुग्णांना उलटी आणि मळमळीचा त्रास सुरु झाला होता. मात्र, सकाळपर्यंत रुग्णांची संख्या वाढत वाढत ५२ पर्यंत पोहोचली. विषबाधेच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी माहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी किरण वाघमारे, तहसीलदार किशोर यादव यांनी तालूक्यातील सर्व आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांना बोलावून रुग्णांवर उपचार केले.
या घटनेची माहिती मिळताच माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद मुळे, सिर्फराज दोसाणी यांनी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, इतर सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून सायंकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार असल्याची माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली आहे.

