Nagpur Crime News : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगर असलेल्या नागपूर शहरात हत्येची मालिका सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांत तिसरी हत्येची घटना घडली आहे. ज्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.
हर्ष राजू शेंडे (वय २२, हिवरी नगर, नंदनवन) असे मृतकाचे नाव आहे. तर दुर्गेश रारोकर (वय २५, भांडेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २०२२ साली मृतक हर्ष शेंडे आणि त्याचा चार मित्रांनी मिळून डिजेवर नाचण्यावरुन झालेल्या भांडणात अभिषेक हुमने या तरुणाची हत्या केली होती. त्यानंतर अभिषेक हुमने याचा मित्र दुर्गेश हर्षवर चिडून होता. दुर्गेश अनेक दिवसांपासून आपल्या मित्राच्या हत्येचा बदला घेण्याचा तयारीत होता.
दरम्यान, शनिवारी दुपारी ३ वाजता हर्ष शेंडे चंद्रनगर चौकात एकटा उभा असल्याची दुर्गेशला समजले. त्यानंतर दुर्गेशने आपल्या चार मित्रांनाही तिथे बोलावले आणि सर्वांनी मिळून हर्षसोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर सर्वांनी हर्षवर चाकू आणि तलवारीने वार करून त्याची हत्या केली. नंतर घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींनी परिसरात दहशत पसरवण्यासाठी हर्षची भरदुपारी चौकात हत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणी पारडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे शहर असलेल्या नागपूरमध्ये हत्येची मालिका आणि वाढत्या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि असुरक्षतेचे वातावरण आहे. शहरातील सुरक्षेची स्थिती गंभीर बनली आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाला कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

