• Thu. Sep 3rd, 2026

महाराष्ट्र जलसमृद्ध करायचाय – जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jan 23, 2025
महाराष्ट्र जलसमृद्ध करायचाय – जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

जलसंपदा विभागाचे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पारितोषिक वितरण

छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका) – जलसंपदा विभागामध्ये प्रचंड क्षमता आहे. हा विभाग महाराष्ट्राला जलसमृद्ध करुन शेतकऱ्याला सुखी आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करु शकतो. आपण साऱ्यांनी एकजुटीने काम करावे आणि महाराष्ट्राला जलसमृद्ध करावे,असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखेपाटील यांनी केले.

जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे पारितोषिक वितरण डॉ. विखेपाटील यांच्या हस्ते आज पार पडले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ संतोष तिरमनवार,मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, मुख्य अभियंता लाभ क्षेत्र विकास जयंत गवळी, मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता इलियास चिस्ती,  अधीक्षक अभियंता पल्लवी जगताप, अजय दाभाडे, भारत शिंगाडे यांची उपस्थिती होती.

डॉ. विखे पाटील म्हणाले की, या विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा ताण तणाव निवळावा यासाठी अशा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे.  ताणतणावात काम केल्याने विकासाच्या प्रक्रिया मंदावतात. त्यासाठी परस्पर संवाद वाढविणे आवश्यक आहे. हा संवाद वाढविण्यात अशा सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांचे मोठे योगदान असते. आपला विभाग हा थेट शेतकऱ्यांशी संबंधित असल्याने आपण शेतकऱ्यांशी संवाद वाढवावा. जलसंपदा विभाग हा शेतकरीभिमुख व्हावा, यासाठी माझे प्रयत्न आहेत. सिंचनक्षमता वाढवून आपण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करु या. त्यासाठी विभागाचा प्रमुख या नात्याने मी सदैव अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. पाणी व्यवस्थापन, सिंचनाचे निकष, वॉटर ऑडीट या संकल्पनांवर आपण काम करण्याची गरज असून सिंचनाचे नवे तंत्र आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून आहे त्या पाण्याचा अधिक व प्रभावी वापर करण्याविषयी आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले पाहिजे,असे त्यांनी सांगितले.

राज्यातील सिंचन प्रकल्पांची पूर्ण होण्याची कालमर्यादानिहाय आपण नियोजन केले पाहिजे. यासोबतच पाण्याची गळती सारख्या बाबींवर नियंत्रण मिळवले पाहिजे. आपल्या विभागाच्या क्षमतेचा पुरेपुर वापर करुन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करु या,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व सर विश्वेश्वरय्या यांच्या  प्रतिमेचे पुजन करण्यात आले. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना आजच मानद डॉक्टरेट पदवी मिळाली त्याबद्दल  त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed