• Thu. Mar 19th, 2026

    कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 8, 2025
    कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद




    मुंबई दि. ८ : पाणी पुरवठा व  स्वच्छता विभागाच्या योजनांतर्गत  मंजूर विविध कामांची विहीत कालमर्यादेत  पूर्तता न करणाऱ्या  कंत्राटद्वारांवर  नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधितांना दिले.

    मंत्रालयात आयोजित ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कामांच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. पाटील यांनी संबंधितांना सूचना दिल्या. बैठकीस विभागाचे  सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशन अभियानाचे संचालक ई. रविंद्रन यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री श्री.पाटील यांनी जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा, असे सूचित करून त्यांनी विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे कामात दिरंगाई करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सूचित केले.  त्याचप्रमाणे कामांची वेळोवेळी पाहणी करुन त्याबाबतचा अद्यावत क्षेत्रीय पाहणी आणि आर्थिक प्रगती अहवाल ठेवावा. कामांची पाहणी करून त्यानतंरच प्रमाणिकरण द्यावे. तसेच पूर्ण झालेल्या योजना हस्तांतरित करुन योजना अंमलबजावणीच्या कामांची टप्पे निहाय जबाबदारी निश्चित करण्यात यावी.  योजनांची अमंलबजावणी दर्जेदाररित्या वेळेत पूर्ण  होण्याच्या दृष्टीने यंत्रणा प्रमुखांनी त्यांच्यास्तरावर कटाक्षाने लक्ष देऊन तालुका निहाय आढावा घ्यावा,असे सूचित केले.

    बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत  कार्यान्वीत घरगुती नळ जोडणी सद्यस्थिती, हर घर जल प्रमाणीकरण, आर्थिक खर्चाची सद्यस्थिती, योजना पूर्ण व हस्तांतरण सद्यस्थिती, प्रलंबित योजनांची माहिती, स्वच्छ भारत मिशन, (ग्रा.) 2.0 या योजनेच्या अंतर्गत विविध कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

    0000

    वंदना थोरात/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed