Ratnagiri News : राजन साळवी यांनी आपला सूर बदलला आहे. आपण पदाधिकाऱ्यांजवळ चर्चा करुन योग्य निर्णय योग्य वेळी घेऊ अशी प्रतिक्रिया देत पक्षबदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.
त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावरच ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत महायुती आहे. पक्षातील वरिष्ठांमुळेच आपल्याला पराभवाला समोर जावं लागल आहे. त्याचा शोध घेऊन नेतृत्वाने कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा माझ्यावर जशी वेळ आली तशी वेळ अन्य कोणावरही येऊ शकते. असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केलं. मात्र साळवी यांचा वरिष्ठ नेतृत्व म्हणजे नेमका रोख कोणाकडे याबाबत मात्र उलट सुलट चर्चा सुरू झाल्या असून, हा नेता कोकणातीलच असल्याचीही चर्चा आहे.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पाठींबा
पराभवमुळे दुःखाचा डोंगर जसा पक्षावर कोसळला, तसा माझ्यावर देखील कोसळला. माझ्या कुटुंबावर कोसळला. या पराभवाला नेमकं कारणीभूत कोण आहे हे शोधणे गरजेचे आहे. असंही साळवी यांनी म्हटलं आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनी आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितल आहे त्यामुळे मी लवकरच योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असे साळवी यांनी सांगितलं आहे. गुरुवारी व शुक्रवारी या दोन्ही दिवशी राजापूर व लांजा येथील पदाधिकाऱ्यांनी साळवी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून “तुमच्यावरती अन्याय झाला आहे तुम्ही योग्य निर्णय घ्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत” अशी ग्वाही आपल्याला दिल्याची माहिती साळवी यांनी दिली आहे.
