Pune News : नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्या या निर्णयाला सुरुवातीला कुटुंबीयांचा विरोध असलेल्या समीरने आपल्या जिद्दीने सर्वांनाच चुकीचे ठरवले. लॉकडाऊनच्या काळातही त्याने ऑनलाइन व्यवसायाद्वारे लाखोंची कमाई केली. समीर इतर शेतकऱ्यांनाही शेतीकडे परतण्याचा सल्ला देतो.
घरच्यांचा विरोध तरीही…
मेकॅनिकल इंजिनीअर असलेले समीर डोंबे यांने आपली ४०,००० रुपये प्रति महिना असलेली नोकरी सोडून आपल्या कुटुंबाच्या पारंपरिक व्यवसायाकडे परतण्याचा निर्णय घेतला. समाजात चांगली नोकरी आणि पगार असलेला मुलगाच लग्नासाठी पात्र मानला जातो, त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती केल्याने आपल्या मुलाला चांगले स्थळ मिळेल की नाही अशी काळजी त्याच्या आई-वडिलांना वाटत होती. त्यामुळे त्याच्या या निर्णयाला सुरुवातीला कुटुंबातील सदस्य आणि मित्र, कोणीही पाठिंबा दिला नाही. पण, आपल्या निर्णयावर ठाम राहत त्याने अंजीर शेतीची आपल्या कुटुंबाची जुनी परंपरा पुढे नेण्याचा निर्णय घेतला. समीरला शेतीत यश मिळणार नाही, असे सर्वांना वाटत होते. पण, समीरने सगळ्यांनाच चुकीचं ठरवलं. आज तो अंजीर विकून वर्षाला दीड कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहेत.
मार्केटिंग चा फायदा झाला
समीरचे कुटुंब पूर्वीपासूनच शेती करत असल्याने त्याच्यासाठी शेतीची कामे नवीन नव्हती. त्याला शेतीच्या तंत्राचे चांगले ज्ञान होते. त्याने अडीच एकर जमिनीत अंजीर लागवड सुरू केली. परंतु, अंजीर थेट बाजारात पारंपरिक पद्धतीने विकण्याऐवजी त्याने ते १ किलोच्या डब्यात पॅक केले. त्याच्या एका मित्राने त्याला सुपरमार्केटशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. समीर एका सुपरमार्केटशी संपर्क साधला आणि ‘पवित्रक’ नावाने त्याचे अंजीर विकू लागला. या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याने आणखी तीन सुपरमार्केटशी करार केले.
त्यानंतर अल्पावधितच त्याचे अंजीर पुणे, मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये पोहोचले. अंजीरच्या डब्यांवर त्याचा संपर्क क्रमांक असल्याने ग्राहक त्याच्याशी थेट संपर्क करू लागले. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळू लागल्या. या ऑर्डर्सची पूर्तता करण्यासाठी समीरने छोटे छोटे गट तयार केले. अशा प्रकारे तो अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकला आणि त्याचा नफाही वाढला.
अंजीरच निवडण्याचे कारण
दौंडचा परिसर डोंगराळ असल्याने येथे पाणी लवकर मुरते आणि बाष्पीभवनाची पातळी देखील मध्यम राहते. महामार्गापासून १० किलोमीटर अंतरावर असल्याने समीरच्या शेताला स्वच्छ पाणी सहज मिळते. शिवाय,
अंजीरला बाजारात भरपूर वाव आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या अंजीरांना खूप मागणी आहे. परंतु, त्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत नाही.या संधीचा समीरने योग्य वेळी फायदा घेतला.
ऑनलाइन व्यवसाय
हळूहळू समीरने आपल्या शेताचे क्षेत्र अडीच एकरांवरून ५ एकरांपर्यंत वाढवले. त्यांनी अन्न प्रक्रिया युनिटही स्थापन केले. लॉकडाऊनच्या काळात समीरने अनेक ग्राहकांशी संपर्क साधल्याने थेट ग्राहकांशी जोडला गेला. त्याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळात त्याने ऑनलाइन ऑर्डरद्वारे १३ लाख रुपये कमावले. समीर सर्वांना, विशेषतः शेतकऱ्यांच्या नोकरदार मुलांना शेतीकडे परत जाण्याचा सल्ला देतो.

