BJP Workers Vandalized Congress Office: मुंबईत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं ऑफीस फोडलं आहे. आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल केला.
हायलाइट्स:
- भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं ऑफीस फोडलं
- काँग्रेस विरोधात आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते आक्रमक
- मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालावर दगडफेक अन् शाईफेक
भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर शाईफेक केली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर लागलेल्या राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पोस्टरवर शाईफेक केली. तसेच, राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोडही केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाच्या खिडक्यांची काच फोडली, पोस्टर फाडले. यावेळी दगडफेकही करण्यात आली. तसेच, भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. भाजप कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिस लाठीचार्ज करताना दिसले. तसेच, काही आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.
काँग्रेसने नेहमीच संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आली आहे, असं म्हणज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड केली. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
अमित शाह काय म्हणाले होते?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. भाषणादरम्यान अमित शाह म्हणाले होते की, “आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर…एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता.” शाहांच्या या वक्तव्यावरुन देशात मोठा गोंधळ माजला आहे.

