• Mon. Mar 9th, 2026
    दिल्लीचे पडसाद मुंबईत; भाजपच्या आंदोलनाला हिंसक वळण, कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं

    BJP Workers Vandalized Congress Office: मुंबईत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं ऑफीस फोडलं आहे. आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल केला.

    हायलाइट्स:

    • भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं ऑफीस फोडलं
    • काँग्रेस विरोधात आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते आक्रमक
    • मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालावर दगडफेक अन् शाईफेक
    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी थेट काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर हल्लाबोल केला. मुंबईतील किल्लाकोर्ट परिसरातील काँग्रेस कार्यालयात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते चालून गेले आणि तिथे मोठा गोंधळ घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर शाईफेक केली, दगडफेक करत तोडफोडही केली. त्यामुळे तिथे काँग्रेस आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र काहीच वेळात या मोर्चाने आक्रमक रुप धारण केलं आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी किल्ला कोर्ट परिसरातील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्लाबोल केला.

    भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर शाईफेक केली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर लागलेल्या राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पोस्टरवर शाईफेक केली. तसेच, राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

    भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोडही केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाच्या खिडक्यांची काच फोडली, पोस्टर फाडले. यावेळी दगडफेकही करण्यात आली. तसेच, भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. भाजप कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिस लाठीचार्ज करताना दिसले. तसेच, काही आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.

    काँग्रेसने नेहमीच संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आली आहे, असं म्हणज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड केली. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

    अमित शाह काय म्हणाले होते?

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. भाषणादरम्यान अमित शाह म्हणाले होते की, “आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर…एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता.” शाहांच्या या वक्तव्यावरुन देशात मोठा गोंधळ माजला आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed