Uday Samant : बेळगावच्या सीमा भागातील ८६८ गावांच्या सीमा भागात असलेल्या मराठी संस्थांना जे अनुदान मिळाले, ते मागच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मिळाले, असे मोठे विधान उदय सामंतांनी केले आहे.
काही लोक फक्त पत्र लिहितात मात्र जे तिथे कधी गेलेच नाहीत त्यांना केवळ पत्र लिहून तिथल्या व्यथा त्यांना कळणार नाहीत अशा शब्दात उदय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.
रत्नागिरीचे नवनिर्वाचित आमदार उदय सामंत यांनी आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बेळगाव सीमाभागातील प्रश्नांवर भाष्य केले आहे. ‘मविआची ज्यावेळी सत्ता होती, त्यामध्ये आम्हीही होतो. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीबरोबर कितीशा बैठका झाल्या?’ अशा सवाल उपस्थित करत ‘आपण उद्योगमंत्री असताना त्या भागात बेरोजगारांचा मेळावा घेतला आणि तेथील बेरोजगारांना १७०० जणांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या’ असे उदय सामंतांनी म्हटले आहे.
तसेच नव्या मंत्रीमंडळाबाबत सामंतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘मंत्रीपदाबाबतच्या सगळ्या निर्णयाचे अधिकार आम्ही एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. येत्या दोन दिवसांत याबाबत कळेलच. त्यामुळे हा सस्पेन्स दोन दिवस तुम्ही तसाच ठेवा.’ तर ‘दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री दोन वाजेपर्यंत बैठक झाली आहे. सगळं काही सकारात्मक आहे, सन्मानपूर्वकच मंत्रीपदाचं वाटप होईल असेही सामंतांनी नमूद केले.
काँग्रेस सरकारने कर्नाटकमध्ये जी हिटलरशाही सुरू केली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. याच कर्नाटकच्या सरकारने पुढचं पाऊल टाकत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमानही केला आहे. आम्ही आज रत्नागिरी निघालेला हिंदू जनजागृती मोर्चाच्या माध्यमातून कर्नाटकमधील या काँग्रेसच्या सरकारचा आम्ही निषेध करतो, अशी भूमिका देखील उदय सामंतांनी मांडली. तसेच बांगलादेशमध्ये हिंदूंवर चाललेल्या अत्याचार विरोधात मंगळवारी रत्नागिरी येथे विश्व हिंदू परिषदेतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला शिवसेनेच्या आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचे देखील ते म्हणाले. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत व जशास तसे उत्तर बांगलादेशला दिले जावे, हीच या आंदोलनामागची भूमिका असल्याचेही सामंत म्हणाले.
या पत्रकार परिषदेत राजापूरचे आमदार किरण सामंत हेही उपस्थित होते त्यांनी यावेळी रिफायनरी हा विषय आपल्या दृष्टीने संपला असल्याचे स्पष्ट केले. लांजा राजापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून येथील विकास आराखड्याला विशेष निधी मिळून विकासाला चालना दिली जाईल असेही मत यावेळी किरण सामंत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

