महाराष्ट्र टाइम्स | Updated: 8 Dec 2024, 7:59 am
Sharad Pawar News: खासगी कामानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘विधानसभा निकालानंतर राज्यभर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘ईव्हीएम’बाबत माझ्याकडे आकडेवारी नाही.
हायलाइट्स:
- मारकडवाडीला जाऊन लोकांना नेमके काय म्हणायचे आहे ते जाणून घेणार
- राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी आश्चर्यकारक
- छोट्या राज्यात विरोधक आणि मोठ्या राज्यात सत्ताधारी असाच निकाल लागत आहे.
‘विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला ७२ लाख मते मिळाली आहेत. मात्र, आमचे १० उमेदवार निवडून आले आहेत. अजित पवारांची ५८ लाख मते आहेत, मात्र त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले आहेत. ८० लाख मते मिळालेल्या पक्षाचे १५, तर ७९ लाख मते मिळालेल्या पक्षाचे ५७ आमदार निवडून येतात. अशी सर्व आकडेवारी आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र, मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत,’ असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचेही पवार यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला राज्यातून मोठा विरोध होत आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातून मोठे आंदोलन उभा करण्यात आले होते. निवडणुका तोंडावर असल्याने राज्य सरकारने हा शक्तिपीठ महामार्ग स्थगित केला होता. मात्र आता काल एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग होणारच, असे म्हणाले आहेत यानंतर शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. या संदर्भात देखील शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून शक्तिपीठला ज्याचा ज्याचा विरोध आहे, त्याच्याशी आम्ही बोलणार आहोत. त्याचा विरोध असेल तर आम्ही सरकार समोर तशी भूमिका मांडू, असे पवार म्हणाले आहेत.
