• Sat. Sep 21st, 2024
पुण्यात अपहरण करुन तरुणीची हत्या खंडणीसाठीच की…? हत्येमागील कारण अस्पष्ट

म. टा. प्रतिनिधी, पुणे : विमाननगर परिसरातून अपहरण झालेल्या तरुणीचा खंडणीच्या उद्देशाने खून केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले, तरी तिचे अपहरण करण्यापूर्वीच नगर जिल्ह्यातील कामरगावमध्ये शेतात खड्डा खोदून मृतदेहाच्या विल्हेवाटीची व्यवस्था आरोपींनी केली होती. आरोपींनी एक दिवस आधीच फावडे आणि टिकाव खरेदी केले होते. अपहरणाच्या दिवशीही ते साहित्य आरोपी सोबत घेऊन गेले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे तरुणीच्या खुनामागे खंडणी हाच उद्देश होता की आणखी काही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.भाग्यश्री सूर्यकांत सुडे या तरुणीचे ३० मार्चला रात्री अपहरण करण्यात आले. त्याच दिवशी तिचा खून झाल्याचे सात एप्रिलला समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र शुभम फुलावळे याच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे. कर्जबाजारी झाल्याने खंडणीच्या उद्देशाने भाग्यश्रीचे अपहरण करून खून केल्याचे आरोपींनी कबूल केले, असे विमानतळ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, आरोपींनी उलगडलेल्या घटनाक्रमामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, काही गोष्टी लपविण्यात येत असल्याचा संशय निर्माण होत आहे.
पवारांना पाडण्याची भाषा मवाळ, शिवतारे सुनेत्रांच्या भेटीस, पुरंदरमधून ५० हजारांच्या लीडचं वचन

शुभमने ३० मार्चला रात्री भाग्यश्रीला बाहेर जेवायला जायचे आहे, असे सांगून बोलावून घेतले. त्यानुसार, भाग्यश्री फिनिक्स मॉल येथे शुभमला भेटली. कारमध्ये आणखी दोघे असल्याचे पाहून भाग्यश्रीने त्याच्याकडे विचारणा केली. त्यावर शुभमने ते मित्र असल्याचे सांगितले. त्यानंतर गाडी नगर रस्त्याने घेऊन ते पुढे गेले. वाटेतच त्यांनी भाग्यश्रीचा खून केला, असे पोलिसांनी सांगितले.

‘पेट्रोल’ही सोबत घेतले होते

खून केल्यानंतर भाग्यश्रीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी बाटलीत पेट्रोलही भरून आणले होते. त्यामुळे तिचा मृतदेह जाळायचा, हे त्यांनी आधीच ठरवले होते अशी शंका निर्माण होते, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सात दिवस काय केले?

मुलीशी संपर्क होत नसल्यामुळे सुडे कुटुंबीयांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी (३१ मार्च) विमानतळ पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्याच दिवशी तिचे अपहरण झाल्याचे स्पष्ट झाले आणि सातव्या दिवशी तिचा खून झाल्याचे उघड झाले. मुलगी हरवल्यापासून तिचा खून झाल्याचे समजेपर्यंत सात दिवसांचा कालावधी गेला. या सात दिवसांत विमानगर पोलिसांनी काय पावले उचलली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार घटनाक्रम

३० मार्च : फिनिक्स मॉल येथून भाग्यश्रीचे अपहरण. कारमधून नगरच्या दिशेने जाताना भाग्यश्रीचा खून.

३० मार्च : मध्यरात्री नगर जिल्ह्यातील कामरगाव परिसरात पेट्रोल ओतून भाग्यश्रीचा मृतदेह जाळला आणि खड्ड्यात पुरला.

३१ मार्च :भाग्यश्रीच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधला असता, मोबाइल बंद असल्याचे आढळले.

एक एप्रिल : सुडे कुटुंबीयांनी विमानतळ पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली.

दोन एप्रिल : भाग्यश्रीच्या मोबाइलवरून तिच्या कुटुंबियांकडे आरोपींनी खंडणीची मागणी केली.

चार एप्रिल : आरोपींनी भाग्यश्रीच्या आईला खंडणीसाठी मेसेज केला.

आरोपींना १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

– आरोपींनी मुलीचे अपहरण केल्यावर तिचा खून करण्यापूर्वी शारीरिक अत्याचार केले का, यासाठी त्यांची अद्याप वैद्यकीय तपासणी करणे बाकी आहे.

– गुन्हा केल्यानंतर आरोपी नांदेड आणि मुंबई येथे पळून गेले होते. ते कोणाच्या घरी होते, याचा तपास करायचा आहे.

– आरोपींनी वापरलेली कार आणि मुलीचे सिम कार्ड हस्तगत करायचे आहे, या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, यासह गुन्ह्यामागचा हेतू शोधून काढण्यासाठी आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी सर्जेराव कुंभार आणि सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी केली.

– न्यायालयाने बचाव पक्षाची बाजू ऐकल्यावर आरोपींना १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed