• Sat. Sep 21st, 2024
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात ‘बढती’, विधी महाविद्यालयांकडून सोयीचा गैरवापर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : विधीचे प्रथम आणि द्वितीय अशा दोन्ही वर्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका निर्णयाचा गैरवापर करून तिसऱ्या वर्षाला सर्रास प्रवेश दिला जात असल्याची घटना समोर आली आहे. विद्यापरिषदेने घेतलेल्या एका निर्णयाचा उलट अर्थ काढून पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांमधील काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने त्यांना अपात्र ठरवल्याने आता परीक्षा विभागावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सात हजार जणांना फायदा

करोनाच्या काळामुळे परीक्षा घेण्याच्या प्रकारात अनेक बदल झाले. करोनाच्या काळात ऑनलाइन मग करोना संपल्यानंतर ऑफलाइन अशा परीक्षांमुळे अभियांत्रिकीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचे काही विषय अनुत्तीर्ण राहिले. या विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या वर्षातील विषय उत्तीर्ण असतील आणि पहिल्या वर्षातील काही विषय राहिले असतील, अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात तात्पुरते प्रवेश देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्या परिषदेने घेतला. या निर्णयामुळे जवळपास सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला.

पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्याचा तोटा; बहुराष्ट्रीय कंपन्यांनी फिरवली पाठ

निर्णयाचा गैरफायदा


या निर्णयाचा गैरफायदा काही विधी महाविद्यालयांकडून घेतला जात असून, या महाविद्यालयांकडून पहिले आणि दुसरे वर्ष अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या वर्षात प्रवेश दिला जात असल्याचे परीक्षा विभागाच्या लक्षात आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रणालीतून बाहेर काढण्यात आले. परिणामी, आता तिन्ही जिल्ह्यातील काही विधी महाविद्यालये ‘या विद्यार्थ्यांना विद्यापीठाला जाब विचारा,’ असे सांगत असून, या महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचा आधार घेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी केला आहे.

‘विद्यार्थ्यांवर कारवाई होणारच’

‘विद्या परिषदेने घेतलेला निर्णय विधी महाविद्यालयांनी पुन्हा एकदा तपासून घ्यावा. दुसऱ्या वर्षातील विषय उत्तीर्ण असतील आणि पहिल्या वर्षाचे काही विषय राहिले असतील, तर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना तात्पुरता प्रवेश देणे, असा निर्णय आहे. इथे काही विधी महाविद्यालये दोन्ही वर्षांत अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या वर्षात प्रवेश देत आहेत. या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे,’ असे परीक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्या परिषदेने घेतलेल्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. या निर्णयानुसार पात्र ठरलेल्या सात हजार विद्यार्थ्यांना कोणतेही नुकसान पोहोचवलेले नाही. मात्र, जे विद्यार्थी दोन्ही वर्षांत अनुत्तीर्ण आहेत, अशांवर कारवाई केली गेली आहे. यामुळे दबाव टाकण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.

– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed