• Sun. Mar 15th, 2026

    करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांसाठी मोठी बातमी; देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती समोर

    करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांसाठी मोठी बातमी; देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती समोर

    कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाली असून देवीचे नाक, ओठ, हनुवटी याला तडे गेले असल्याने चेहरा व किरीट या भागाचे तातडीने संवर्धन तातडीने गरजेचे आहे असा अहवाल न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने दिला आहे.

    अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाल्याच्या पार्श्वभूमीवर संवर्धनासंबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांच्यासमोर सुरू आहे. या दाव्यामध्ये वादी गजानन मुनीश्वर व इतर यांनी पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी व्हावी अशी मागणी केली होती. त्यानुसार तज्ज्ञ समितीने पाहणी करून न्यायालयात अहवाल सादर केला. पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगीराज यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

    समितीने आठ पानाच्या या अहवालात काही निष्कर्ष नोंदवले आहेत. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज झाली आहे. ती झीज २०१५ साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे. त्याचबरोबर देवीचे नाक ओठ हनुवटी या सगळ्या वरती तडे गेले आहेत. ते तडे या २०१५ साली झालेल्या रासायनिक संवर्धनाच्या वापरल्या गेलेल्या साहित्याला गेलेले आहेत. तरी चेहरा व किरीट या भागाचे तातडीने संवर्धन तातडीने गरजेचे आहे.

    या संवर्धन प्रक्रिया करता वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्याचे तडे जाऊन थर निघत असल्याचे अनुमान तज्ञांनी काढले आहे. त्याचबरोबर अन्य ठिकाणच्या लेपाला देखील तडे असल्याचे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे.

    यावर उपाय म्हणून मूर्ती भक्कम करण्याकरता ईथील सिलिकेटचे द्रव्य वापरून हे तडे मुजवता येतील तसेच मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे लागणार आहेत. अखेरीला रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर वेळोवेळी मूर्तीचे निरीक्षण करून योग्य ती काळजी घेणे. मूर्तीला स्नान न घालता नाजूक सुती कापडाने पुसून घेणे. मूळ मूर्तीला पुष्पहार वगैरे न घालता केवळ उत्सव मूर्तीला फुलांचे हार घालणे. गर्भगृहातील संगमरवर काढणे कीटकांचा उपद्रव होऊ नये याकरता योग्य ती उपाययोजना करणे. तसेच आर्द्रता व तापमान यांचे नियंत्रण करणे अलंकार व किरीट घालताना योग्य ती काळजी घेणे अशा प्रकारच्या सूचना देखील केलेल्या आहेत.

    या सुनावणी प्रसंगी ॲड नरेंद्र गांधी, ॲड ॐकार गांधी, वादी गजानन विश्वनाथ मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर, लाभेश मुनीश्वर, प्रतिवादी दिलीप देसाई ॲड प्रसन्न मालेकर हे उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed