• Thu. Mar 19th, 2026
    अजूनही वेळ गेलेली नाही, पण खेद आहे की…; जयंत पाटलांचे सूचक भाष्य

    अहमदनगर : ‘मतविभाजन भाजपच्या फायद्याचे ठरावे म्हणून काहीजण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत’, असे सूचक भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नाव न घेता केले. मात्र, याच संबंधीच्या प्रश्नावर बोलताना पाटील पुढे म्हणाले, ‘वंचित बहुजन आघाडीशी आम्ही चर्चा केलेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. पण खेद आहे की, त्यांचे जमेनासे दिसत आहे,’ असेही पाटील म्हणाले.

    अहमदनगर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी पाथर्डी तालुक्यातील मोहटा गडावर झाला. त्यासाठी पाटील आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, पक्ष सोडून गेलेले अनेक आमदार परतीच्या वाटेवर आहेत, शरद पवारांकडे येणार आहेत. जागा वाटपाला उशीर होत असला तरी सर्वांची बाजू समजून घेऊन एकमत करण्यावर भर दिला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    उमेदवार लंके यांचे त्यांनी कौतूक केले. पाटील म्हणाले, निलेश लंके हे सर्व समाजाचे प्रतिनिधी आहेत. जातपात-धर्म अशी कोणतीही आडकाठी त्यांना नाही. बारा बलुतेदारही त्यांचे समर्थन करीत आहेत. सर्व बंधनांच्या पलीकडे जाऊन त्यांना मत देण्यास ते इच्छुक आहेत व आमच्या सर्व्हेक्षणात निलेश लंकेच दक्षिणेतून विजयी होणार असे वातावरण आहे, असा दावाही पाटील यांनी केला. कोणत्याही यंत्रणेचे ओझे नसलेला आमचा उमेदवार आहे. साहेब मिटींगमध्ये बसले असे उत्तर त्यांच्याबाबत येणार नाही. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते २४ तास उपलब्ध असणार आहेत. स्थानिक असलेला आपला उमेदवार निलेश लंके आपल्या सुख-दुःखात समरस होणारा नेता आहे व त्यांचा विजय निश्चित आहे. लंके यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर गावा-गावांतून उत्साहाचे वातावरण आहे.

    शेतकरी अडचणीत आहेत. पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी नाही, बेरोजगारी व अन्य समस्याही अनुत्तरीत आहेत. यावर उत्तम तोडगा लंके यांच्या उमेदवारीतून दिला असल्याचे सांगून पाटील म्हणाले, लंके सामान्य माणूस आहेत व ते शून्यातून विश्वनिर्मिती करू इच्छितात. त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे व त्यांच्या सेवेत दुजाभाव नसतो. कोविड काळात त्यांनी केलेली मदत सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ते शंभर टक्के विजयी होतील. येत्या १६ दिवसात ते मतदार संघातील किमान पन्नास टक्के गावांतून जाणार आहेत. नवे व स्वच्छ आणि तळागाळात काम करणारे नेतृत्व असल्याने गावा-गावांतून गेल्यावर व त्यांचे उत्स्फूर्त स्वागत नक्कीच होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

    यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे व राजेंद्र दळवी, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed