नांदेड हा पूर्वीपासून काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुरूंग लावत नांदेडमध्ये शिरकाव केला. भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. ४० हजाराहून अधिक मतांनी चव्हाण यांचा पराभव झाला होता. विशेष म्हणजे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना २०१९ च्या निवडणुकीत सहा विधानसभा मतदार संघापैकी नायगाव-बिलोली, देगलूर आणि मुखेड या तीन विधानसभा मतदारसंघातून जास्तीचं मताधिक्य मिळालं होतं. नायगाव बिलोली मतदारसंघातून चिखलीकर यांना ९२ हजार ७५ मतं मिळाली होती, तर अशोक चव्हाण यांना ७१ हजार ४७४ मतं मिळाली. देगलूर विधानसभा मतदार संघातून चिखलीकर यांना ८७ हजार २२२ आणि चव्हाण यांना ६३ हजार ९०९ मतं, मुखेड विधानसभा क्षेत्रातून चिखलीकर यांना ८९ हजार ९९९ तर चव्हाण यांना ५३ हजार ८३९ मतं मिळाली होती. या तिन्ही विधानसभा मतदार क्षेत्रात भाजपला जास्तीचं मताधिक्य मिळालं होती. तर अशोक चव्हाण यांना नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण आणि भोकर मतदारसंघातून मताधिक्य होतं. वंचित फॅक्टर चव्हाण यांच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं होतं. सहा विधानसभा मतदार क्षेत्रातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांना एकूण १ लाख ६६ हजार इतकं मतं मिळाली होती.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात पुन्हा लढत होणार असल्याचे चित्र होते. मात्र ऐनवेळी अशोक चव्हाण हे भाजपवासी झाले आणि नांदेडच्या राजकारणाचे समीकरण बदलले. पण दुसरीकडे काँग्रेसने देखील नायगाव बिलोली विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार वसंत चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करून भाजपाला टक्कर देण्याची रणनीती आखली आहे. वसंत चव्हाण यांचे नायगाव बिलोली मतदारक्षेत्रात चांगली पकड आहे. शिवाय मुखेड, देगलूर आणि इतर मतदारसंघात त्यांचे नातेसंबंध अधिक आहे. त्यामुळे याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खासदार चिखलीकर यांचीही जिल्ह्यात मजबूत पकड आहे. तेव्हा नांदेडची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार ठरणार आहे.
वंचितच्या भूमिकेकडे लक्ष
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी गेमचेंजर ठरली होती. वंचितचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजार १९६ मतं घेतली होती. मत विभाजनाचा फटका चव्हाण यांना बसला होता. आता पुन्हा वंचितने आपला उमेदवार मैदानात उतरविल्यास काँग्रेसला फटका बसणार आहे. त्यामुळे वंचितच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाने मतदारसंघातही मराठा ध्रुवीकरणाचे मतपेढीत रुपातंर होईल या भीतीने राजकीय नेते मंडळीमध्ये अस्वस्थता आहे.