• Thu. Jun 11th, 2026
    दोन महिन्यांत नालेसफाईचं प्लॅनिंग, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कामांना विलंब, उद्दिष्ट पूर्ण होणार?

    म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई : मुंबईत दरवर्षी पावसाळा तोंडावर येईपर्यंत सुरू राहणारी नालेसफाईची कामे गेल्या वर्षी ३१ मे आधीच पूर्ण झाली होती. त्यासाठी ६ मार्च २०२३पासून या कामांना सुरुवात करण्यात आली. यंदा मार्चचा तिसरा आठवडा सुरू झाल्यावर नालेसफाईच्या कामांना प्रारंभ झाला आहे. मात्र त्यात फारशी प्रगती नाही. नालेसफाईची संपूर्ण कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. परंतु मिठी नदीशिवाय अन्य कामांची गती संथ आहे. दरम्यान, नालेसफाईच्या ७० टक्के कामांचे कार्यादेश नुकतेच देण्यात आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
    नवी मुंबईकरांना जलदिलासा, पाणी कपातीचे संकट टळले, पाणी जपून वापरण्याचे पालिकेकडून आवाहन
    मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यास मदत होते. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट दरवर्षी ठरविले जाते. गेल्या वर्षी ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. गाळ काढण्याच्या कामांना ६ मार्च २०२३पासून सुरुवात करण्यात आली होती. नालेसफाईच्या कामांची अंतिम मुदत ३१ मे अशी निश्चित केली होती. मुदतीतच ही कामे पूर्ण झाली होती. गेल्या वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात कामे सुरू झाली. यंदा मात्र या कामांसाठी मार्चचा तिसरा आठवडा उजाडला आहे. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामांसाठी कार्यादेश देण्याचे काम पूर्ण झालेले नाही.७० टक्केच कार्यादेश देण्यात आले आहेत. मुंबईत काही ठिकाणी कामांना सुरुवात झाली आहे, अशी माहिती देण्यात आली. मिठी नदीतील गाळ काढण्याची कामेही सुरू झाली आहेत. हे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबईतील अन्य ठिकाणी म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. यंदा १५ मेच्या आत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या पालिका कर्मचाऱ्यांवर लोकसभा निवडणूक कामांची जबाबदारी देण्यात आली असून ६० ते ७० टक्के कर्मचारी निवडणूक कामात व्यग्र आहेत. त्यामुळे या कामांवर देखरेख ठेवणे आणि त्याची नोंद करणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. यासाठी पालिकेकडून नियोजनही केले जात आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या उद्दिष्टात नालेसफाईची कामे पूर्ण करणे आणि या कामांवर देखरेख हे सध्या मुंबई महापालिकेसमोरील आव्हान असणार आहे.

    अशी आहे नाल्यांची संख्या

    पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. मुंबईत ३०९ मोठे नाले आणि १ हजार ५०८ छोटे नाले आहेत. तसेच रस्त्यांच्या कडेला असलेली १ हजार ३८० गटारे आणि पाच नद्यांमधून पावसाचे पाणी समुद्रात जाते. त्यामुळे या नाल्यांमधील गाळ १५ मेपर्यंत काढण्याचे उद्दिष्ट असणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed