• Fri. Mar 20th, 2026

    जरांगेंनी लोकसभा लढवावी, माझा त्यांना पूर्ण पाठिंबा, ७० टक्के मते घेऊन विजयी होतील: आंबेडकर

    जरांगेंनी लोकसभा लढवावी, माझा त्यांना पूर्ण पाठिंबा, ७० टक्के मते घेऊन विजयी होतील: आंबेडकर

    मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. ते जालन्यातून ७० टक्के मते घेऊन एकही रूपया खर्च न करता विरोधी उमेदवाराला मात देऊ शकतील, अशी भविष्यवाणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

    ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या खास कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी वंचितची जागावाटपासंबंधी भूमिका, महाविकास आघाडीचे निवडणुकीतील भविष्य, भाजपला रोखण्याचा विरोधी पक्षाचा प्लॅन, अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली मते मांडली. या संपूर्ण मुलाखतीत त्यांनी वंचितला हवे असलेले मतदारसंघ किंवा हव्या असलेल्या जागा सांगण्यास स्पष्टपणे नकार दिला. आमचे उमेदवार पळविले जातात, त्यामुळे मी माझे पत्ते अजिबात खुले करणार नाही, अशी सबब त्यांनी दिली.

    मनोज जरांगे यांनी जालन्यातून लढावं, ७० टक्के मते घेऊन विजयी होईल

    मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, हे मी त्यांना भेटून सांगितले आहे. परंतु ते निवडणूक लढण्यास तयार नाहीत. मी अजूनही सांगतो, माझा आणि माझ्या पक्षाचा त्यांना संपूर्ण पाठिंबा असेल. जालन्यातून त्यांनी जर लोकसभा निवडणूक लढवली तर एकही रुपया खर्च न करता ७० टक्के मते घेऊन ते प्रतिस्पर्धी उमेदवाराला चितपट करतील, अशी मोठी भविष्यवाणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
    राजकारण: अकोला पॅटर्न निर्माण करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना यंदाचा प्रयत्न तारणार? काय आहेत राजकीय गणितं?

    आंदोलनाचे पुढे काय होते, याचा मी साक्षीदार, त्यामुळे….

    जरांगे यांनी लोकसभा लढावी, असा माझा आग्रह आहे. मी त्यांच्या पाठीमागे लागलोय. अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आंदोलनाचा मी साक्षीदार आहे तसेच पवार आणि खेडेकरांच्या नेतृत्वातील मराठा आंदोलनही मी पाहिले आहे. छावा-जिजाऊ संघटनांची घौडदौड आणि दिशाही मी पाहिली आहे. या सगळ्या आंदोलनाचं पुढे काय होतं, हे मला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे जर त्यांना फसायचे नसेल तर त्यांना निवडणुकीला उभे राहावेच लागेल, असे मी स्वत: जरांगे यांना सांगितल्याचे आंबेडकर म्हणाले.

    देवेंद्र फडणवीस थांबलात तर बरं होईल, नाहीतर मला बाहेर पडावं लागेल; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

    निजामी मराठे त्यांना न्याय देणार नाही

    सत्तेत असलेले निजामी मराठे रयत असलेल्या मराठ्यांना कधीही त्यांचे हक्क, अधिकार देणार नाही. निजामी मराठे सत्ता आणि त्यातून आलेल्या पैशांमध्ये मश्गूल आहे. त्यामुळे जर रयत असलेल्या मराठ्यांना हक्क आणि अधिकार मिळवायचे असतील तर जरांगे यांनी निवडणुकीला उभे राहावे, असा सल्ला आंबेडकर यांनी जरांगे यांना दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *