• Thu. Mar 12th, 2026
    जळीत घटनांमध्ये राज्यात मुलांनाच सर्वाधिक चटके, ‘नॅशनल बर्न्स सेंटर’चे निरीक्षण

    मुंबई : घरगुती हिंसाचारासह इतर कारणांमुळे जळीत प्रकरणांमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाण यापूर्वी सर्वाधिक होते. आता यामध्ये मुले व पुरुषांचे प्रमाण वाढते असल्याचे निरीक्षण ‘नॅशनल बर्न्स सेंटर’च्या वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. उपचारासाठी येणाऱ्या १०पैकी आठ रुग्णांमध्ये पूर्वी महिला व मुलींचा समावेश असायचा; आता यात मुले व पुरुष रुग्ण अधिक दिसून येतात.

    अंगावर तेल सांडणे, गरम पाणी ओतून घेणे, घाईगडबडीमध्ये अंगावर गरम अन्न पडणे, विद्युतवाहक उपकरणांमध्ये हात घातल्याने विजेचा धक्का बसणे आदी दुर्घटना मुलांमध्ये वाढत्या आहेत. सांभाळ करण्यासाठी घरी कुणी नसताना वा मुलांच्या नजरचुकीने असे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

    जळित प्रकरणांमध्ये तातडीने विनाशुल्क वैद्यकीय उपचार देण्यासह त्वचेवरील व्यंग दूर करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया ‘नॅशनल बर्न्स सेंटर’मध्ये विनाशुल्क उपलब्ध आहेत. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ आणि रोटरी क्लब ऑफ देवनार यांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतीलच नव्हे, तर राज्यभरातील रुग्णांनी सेंटरशी संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सेंटरचे डॉ. एस. एम. केसवानी यांनी गुरुवारी केले. यासंदर्भात जाणीवजागृतीसाठी आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते.

    जळीत रुग्णांवर वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया, समुपदेशन, प्लास्टिक सर्जरी ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व खर्चिक आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या या उपचारासाठी अनेकांची खर्च करण्याची क्षमता नसते. अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी विनाशुल्क शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजनही ‘नॅशनल बर्न्स सेंटर’ने रोटरी क्लबच्या साह्याने केल्याची माहिती सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. सुनील केसवानी, रोटरी क्लब बॉम्बेचे (उत्तर) सदस्य मेहुल शाह यांनी यावेळी दिली.

    रवी राणा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला, अमरावतीतून खासदारकी कुणाला?

    मोफत शस्त्रक्रिया शिबिरासाठी नॅशनल बर्न्स सेंटर, नवी मुंबई. ०२२-२७७९३३३३, ०९८९२६४९५८२. रोटरी क्लब ऑफ देवनार, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    शस्त्रक्रियेमुळे मिळाला दिलासा

    स्वतःला पेटवून घेतलेल्या मुलीला वाचवताना रिक्षा चालवणाऱ्या रंजना (नाव बदलले आहे) हिचा हात पूर्णपणे भाजला होता. त्यावर उपचार करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. तिने सेंटरमध्ये दीर्घकाळ उपचार घेतले. शरीराचा कोणताही अवयव भाजल्यानंतर तो वाकडा होणे, त्यात व्यंग येणे व त्याची कार्यक्षमता कमी होते. मात्र वैद्यकीय उपचारांनंतर फिजिओथेरपी घेतल्यानंतर आता तो पूर्ववत झाला असून, रंजना आता रिक्षा चालवून कुटुंबाला आधार देत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed