• Fri. Mar 13th, 2026

    भारतीय अर्थव्यवस्थेत लक्षणीय बदल; ‘दी इकॉनॉमिक टाइम्स अ‍ॅवॉर्ड्स फॉर कॉर्पोरेट एक्सलन्स’मध्ये मान्यवरांचे मत

    भारतीय अर्थव्यवस्थेत लक्षणीय बदल; ‘दी इकॉनॉमिक टाइम्स अ‍ॅवॉर्ड्स फॉर कॉर्पोरेट एक्सलन्स’मध्ये मान्यवरांचे मत

    मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेत लक्षणीय बदल घडत आहेत. ठरावीक साच्यापलीकडे बघण्याची सवय नसलेल्यांना हे बदल लक्षात येत नाही आहेत, असे मत भारतीय उद्योगजगत आणि सरकारमधील धोरणकर्त्यांनी व्यक्त केले. शुक्रवारी मुंबईत पार पडलेल्या ‘दी इकॉनॉमिक टाइम्स अॅवॉर्ड्स फॉर कॉर्पोरेट एक्सलन्स’च्या सोहळ्यात हे मत व्यक्त करण्यात आले.

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘रोजगार आणि खासगी गुंतवणूक यांसारख्या घटकांचे मूल्यमापन करताना भारतीय अर्थव्यवस्थेतील हे बदल लक्षात घेतले पाहिजेत. आपण आकडेवारी पाहायला जातो तेव्हा आपण नेहमीच्या क्षेत्रांचाच विचार करतो. या क्षेत्रांपलीकडे अनेक क्षेत्रे उदयास येत आहेत आणि तेथे अनेक बदल घडत आहेत. मात्र, आपण केवळ जगभरातील मोठमोठे पोलाद प्रकल्प आणि सिमेंटचे कारखाने यांचाच विचार करतो.’

    सीतारामन यांच्या म्हणण्यानुसार, सध्या उद्योग जगताला अतिरिक्त मालसाठवणूक आणि वाहतुकीचा मुद्दा नक्कीच भेडसावतो आहे आणि त्यात सुधारणाही करायला हवी. मात्र, सेमीकंडक्टर, अपारंपरिक ऊर्जा, गोदामे, रेल्वे मालवाहतूक विशेष मार्ग अशा नव्या क्षेत्रांत गुंतवणूक वाढत आहे.

    धोरणकर्त्यांशी अर्थव्यवस्थेवर चर्चा…

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तसेच ‘दी इकॉनॉमिक टाइम्स’चे व्हीसी आणि एमडी समीर जैन यांचे पेहराव राष्ट्रीय ध्वजाच्या रंगांशी एकरूप झाले होते!

    उद्योगांची बदलती दिशा

    या सोहळ्यातील एका परिसंवादात बोलताना ‘लार्सन अँड टूब्रो’चे अध्यक्ष एस. एन. सुब्रह्मण्यम म्हणाले, ‘उद्योगांची दिशा बदलत आहे. डिजिटल व्यवहार, भू-राजकीय बदल, पर्यायी इंधनस्रोत आणि शाश्वत विकासाचे मार्ग यामुळे सध्या उद्योगजगत एका संक्रमणातून जात आहे. आम्ही पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करतो. ‘कोविड-१९’च्या काळात आमचे ग्राहक ९५ टक्के सरकार होते. आता, सरकार केवळ ६५ टक्के ग्राहक आहे. थोडक्यात, खासगी क्षेत्राकडून आमच्या कामासाठी मागणी वाढत आहे आणि हा प्रवाह वाढतच जाणार आहे.’

    et award

    (डावीकडून) सागर अदानी (कार्यकारी संचालक, अदानी ग्रीन एनर्जी), दिनेशकुमार खारा (अध्यक्ष, भारतीय स्टेट बँक), सी. के. वेंकटरमण (एमडी, टायटन), लीना नायर (सीईओ, चॅनल), राजीव जुनेजा (एमडी, मॅनकाइंड फार्मा), ए. एम. नाईक (चेअरमन एमिरेटस, लार्सन अँड टूब्रो), एस. जयशंकर (परराष्ट्रमंत्री), रमेश जुनेजा (अध्यक्ष, मॅनकाइंड फार्मा), आशिमा भट्ट (व्हीपी, एचडीएफसी बँक), हीना नागराजन (सीईओ, डिॲजो), समीर जैन (व्हीसी व एमडी, दी इकॉनॉमिक टाइम्स)

    क्रयशक्तीत वाढ शक्य

    ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित जावा म्हणाले, ‘भारतात क्रयशक्ती अजूनही वाढू शकते. दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर भारताची क्रयशक्ती अद्याप बरीच कमी आहे. ती भविष्यात, सर्व क्षेत्रांत जोरदार वाढू शकते आणि ही वाढ इंग्रजी ‘एस’ अक्षराच्या वळणाप्रमाणे असेल. भारताच्या उत्पादन क्षेत्रात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे खूप फरक पडणार असून, याचे दीर्घकालीन परिणाम उत्तम असतील.’ ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या तीस लाख किरकोळ विक्रेत्यांपैकी जवळपास १३ लाख विक्रेते आमचे अॅप वापरून विक्री करतात. त्यामुळे डेटा तयार होतो. त्यांना वैयक्तिक व व्यापारी कर्जे मिळण्यासाठी या डेटाचा उपयोग होतो, असेही जावा म्हणाले.

    १८ टक्के विकासदर हवा

    पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल म्हणाले, ‘भारताचा जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) १० लाख कोटी (ट्रिलियन) डॉलर होण्यासाठी वित्त क्षेत्राची वाढ किमान १८ टक्क्यांनी होणे आवश्यक आहे. या वाढीसाठी आवश्यक तेवढे भांडवल आपल्याकडे असेल का, ही मला चिंता आहे. इतिहास असा आहे, की कर्जे आपल्याला पुढे घेऊन जातात. आपल्याकडे बिगरवित्तीय अर्थपुरवठादार संस्था आणि दीर्घकालीन रोखे बाजार हे क्षेत्र वाढण्याची गरज आहे. माझ्या मते, आता वरिष्ठ श्रेणीतील बिगरवित्तीय अर्थपुरवठादार संस्था आता एखाद्या बँकेसारख्याच नियमनात आल्या आहेत. आता त्यांना ठेवी स्वीकारण्याचा परवाना देण्याची आवश्यकता आहे. या संस्था जेव्हा कर्ज देतात, तेव्हा नियामक संस्था रास्तपणे सावध पवित्रा घेते आणि अनेक प्रश्न उपस्थित करून निकष कडक ठेवते. त्यामुळे नव्या अर्थपुरवठादार संस्थांकडून अनुभवाअभावी कमी होणारा वित्तपुरवठा एकूण वाढीला प्रतिबंध करतो.’

    २५ वर्षांतील प्रगतीचा आढावा

    ‘टाइम्स इंटरनेट’चे उपाध्यक्ष सत्यन गजवानी यांनी, ‘ईटी अॅवॉर्ड्स’ सुरू झाल्यापासून, म्हणजे १९९८ पासून गेल्या २५ वर्षांत भारतात झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतातील सरकारी बाजारपेठा, खासगी गुंतवणूक आणि नवउद्योगांची वाढती संख्या याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘१९९८ च्या ‘ईटी’ पुरस्कारांनंतर केलेल्या एका पाहणीत ‘शेअर घेण्यास बहुतांश सर्वसामान्य नागरिक अनुत्सुक’ असा एक मथळा देण्यात आला होता. त्यात अनेक जण शेअर घेण्यापेक्षा विकण्यात जास्त रुची दाखवणारे होते आणि भागधारक नसलेल्यांपैकी केवळ १९ टक्के नागरिक शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास इच्छुक होते. आज आपले शेअर बाजार पाहाल, तर सर्वसामान्य नागरिकांचा त्यात विक्रमी सहभाग दिसेल. सर्व उत्पन्न गटातील किरकोळ गुंतवणूकदार आता आपल्या गुंतवणुकीविषयी अधिक सजग झाले आहेत. खासगी बाजारांतही ‘इक्विटी’ हा विश्वासू, मौल्यवान परतावा मानला जातो. अनेक ठिकाणी येथे सर्वाधिक रोजगारही उपलब्ध आहेत.’ ‘आपण जगाला ‘माया’ ही संकल्पना दिली. त्यामुळे कृत्रिम प्रज्ञा (एआय) आपण एवढ्या उत्स्फूर्तपणे स्वीकारतो आहोत, यात नवल नाही. आज आपली ‘ग्लोबल भारतीय’ मंडळी वॉल स्ट्रीट आणि सिलिकॉन व्हॅलीत आघाडी घेत आहेत. शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या आपल्या पूर्वजांमुळेच हे शक्य झाले आहे, याचीच ही साक्ष आहे,’ असे प्रतिपादनही गजवानी यांनी केले.

    नवे- जुने चेहरे एकाच मंचावर
    पुरस्कार सोहळ्यात एकवटले उद्योग जगतातील दिग्गज

    et award dhiraj hinduja

    ■ धीरज हिंदुजा, कार्यकारी संचालक अशोक लेलँड आणि शोम हिंदुजा

    et award omkar kanwar

    ■ ओंकार सिंग कंवर, अध्यक्ष, अपोलो टायर्स

    ” />

    et award boss

    बोस कृष्णमाचारी,

    सहसंस्थापक व अध्यक्ष कोची- मुझिरिस बिनाले

    et award deepak parekh

    दीपक पारेख,

    माजी अध्यक्ष, एचडीएफसी

    et award ajay piramal

    अजय पिरामल, अध्यक्ष, पिरामल समूह

    et award manisha girotra

    मनीषा गिरोत्रा,

    सीईओ मोएलिस अॅंड कंपनी

    et award ranbir bras

    रणवीर ब्रार,

    सेलिब्रिटी शेफ

    बळकट अर्थव्यवस्था

    ‘डेलॉइट साउथ एशिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोमल शेट्टी म्हणाले, ‘जगातील अनेक प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये सध्या मंदी किंवा मंदीसदृश वातावरण असले तरी भारतात मात्र अर्थव्यवस्था वाढते आहे आणि अधिक बळकट होत आहे. पुढील काही दशके भारत हीच जगातील सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था असणार आहे. वित्तीय शिस्त, पायाभूत सुधारणा आणि प्रत्यक्ष व डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये पुरेशी गुंतवणूक यामुळे हे शक्य झाले आहे.’

    ‘भारत रोज बदलतोय’

    या सोहळ्यात ‘रिफॉर्मर ऑफ दी इयर’ या पुरस्काराने गौरविले गेलेले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी, प्रतिकूल जागतिक परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचे नमूद करून, भारत ही आता जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘भारतात अगदी थोड्या काळानंतर येणारी व्यक्तीही येथे रोज होणारे बदल अनुभवू शकते. जागतिक परिस्थिती विपरीत आहे, तरीही भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. ऊर्जेसंबंधी निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपला निर्णय स्वत: घेण्याची क्षमता असलेला, त्याविषयी खुलेपणाने बोलणारा आणि त्यावरचे उपायही शोधून काढणारा देश म्हणून आज जग भारताकडे पाहते.’

    अनन्या बिर्ला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत…

    उद्योजक, संगीतकार व आदित्य बिर्ला समूहाच्या संचालक अनन्या बिर्ला यांनी ‘ईटी अॅवॉर्ड्स’ सोहळ्याचे सहसूत्रसंचालन करून नवे पाऊल टाकले. उपस्थित उद्योगपतींची मांदियाळी बघून अनन्या यांनी ‘इथे सगळे चांगले लोक बसले आहेत. सो ब्यूटिफुल, सो एलिगंट, जस्ट लूकिंग लाइक ए वॉव….’ या प्रसिद्ध व्हायरल रीलचा उल्लेख केला. अर्थव्यवस्थेवर बोलताना त्या म्हणाल्या, की आपण ‘कौन बनेगा करोडपती’पासून ‘कौन बनेगा १० ट्रिलियन इकॉनॉमी’पर्यंत चाललो आहोत.

    या वेळी जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी, ‘एल अँड टी’चे मानद अध्यक्ष ए. एम. नाईक यांनी अनन्या बिर्ला यांचा खास उल्लेख करून, त्यांचे कौतुक केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed