• Sat. Jun 13th, 2026

    सेलिब्रिटी निवडून आणून चूक केले असे म्हणणारे…; अमोल कोल्हेंच्या खासदारकीवरून जयंत पाटलांचा अजित पवारांना चिमटा

    सेलिब्रिटी निवडून आणून चूक केले असे म्हणणारे…; अमोल कोल्हेंच्या खासदारकीवरून जयंत पाटलांचा अजित पवारांना चिमटा

    पुणे: भारतीय जनता पक्षाने दोन मोठे पक्ष फोडून त्यांना आपले मित्रपक्ष मानले. कारण, तिसरा नवा मित्र मिळणे अवघड आहे. त्यांनी जे काही केले आहे, त्याचा फटका त्यांना येणाऱ्या निवडणुकीत बसेल, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी केली. तसेच भाजपची राज्यात एवढी ताकद असेल, तर मित्रपक्ष अथवा कोणीही काहीही विधान केले तर त्याला गोंजारण्याची, सांभाळण्याची एवढी काय गरज आहे, असा सवालही त्यांनी केला.

    खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी खासदार म्हणून चांगले काम केले आहे. महायुतीला मात्र, उमेदवार सापडत नाही. सेलिब्रिटी निवडून आणून चूक केले असे म्हणणारे पुन्हा सेलिब्रिटींच्या मागेच का धावत आहेत, असा सवाल करत जयंत पाटील यांनी अजित पवार यांना चिमटा काढला.

    पाटील यांनी शनिवारी पुण्यात पक्षाची जिल्हा आढावा बैठक घेतली. याशिवाय त्यांनी मोदी बाग येथे जाऊन पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

    राज्यातील विविध पक्षांनी एकत्र लढावे आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा, अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. आमचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. निवडून येण्याची क्षमता हेच आमचे सूत्र असेल. आमचे पाच सहा उमेदवार निश्चित झाले असले, तरी त्याची घोषणा नंतर केली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापूरमधून लढावे, अशी आम्ही त्यांनी विनंती केली आहे. तर बारामतीमधून सुप्रिया सुळे निश्चित आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

    दोन पक्ष ही वस्तुस्थिती

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच असल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच केला होता. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकच असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत दुफळी झाली असून राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले आहेत, ही वस्तुस्थिती असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यात निवडून येण्याची क्षमता असलेले सर्वाधिक नेते हे राष्ट्रवादीतच होते. पण आता पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असे पाटील म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed