• Sat. Sep 21st, 2024

बाहेर येताच साईबाबांचा सरकारवर निशाणा; … म्हणून मला १० वर्ष तुरुंगात डांबले

बाहेर येताच साईबाबांचा सरकारवर निशाणा; … म्हणून मला १० वर्ष तुरुंगात डांबले

नागपूर : माओवादी संबंध आणि देशविरोधी कारवायांच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यानंतर दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा गुरुवारी तुरुंगातून बाहेर आले. बाहेर येताच साईबाबांनी सरकारवर निशाणा साधत सर्वसामान्यांचा आवाज दाबल्याचा आरोप केला आहे. जी.एन.साईबाबा म्हणाले, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचा आवाज उठवल्याबद्दल १० वर्षे तुरुंगात डांबण्यात आले. मात्र, यापुढेही दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांसाठी आवाज उठवत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तुरुंगातून सुटल्यानंतर साईबाबांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. जेथे ते बोलतांना म्हणाले की, “वंचित, दलित आणि आदिवासींसाठी बोलल्याबद्दल आणि काम केल्याबद्दल मला तुरुंगात टाकण्यात आले. मला दहा वर्षे तुरुंगात राहावं लागले. ज्यावेळी मी तुरुंगात गेलो तेव्हा मी स्वस्थ होतो , पण आज मला अनेक गंभीर आजारांमुळे त्रास होत आहे. मला मधुमेहाचा त्रास आहे. सर्व रिपोर्ट्स येऊनही डॉक्टरांनी माझ्यावर उपचार का केले नाहीत? मला हे समजत नाही.”

साईबाबा पुढे म्हणाले, “मानवी हक्कांसाठी काम करण्याची किंमत मला १० वर्षे तुरुंगात जाऊन घालवावी लागली. आज मी बाहेर आलो असलो तरी, तुरूंगात घालवलेले माझे आयुष्य मला कोण परत करणार? ज्यावेळी मला अटक झाली होती. त्यावेळी मी माझ्या शिक्षकी कारकिर्दीच्या शिखरावर होतो. त्यामुळे माझी शिक्षकाची कारकीर्दही उद्ध्वस्त झाली.”

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रश्नावर माजी प्राध्यापक जी . एन.साईबाबा म्हणाले, “मी निवडणूक लढवणार नाही. मी एक शिक्षक आहे आणि आयुष्यभर शिक्षकच राहणार आहे. मात्र, मी अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलितांबद्दल बोलत राहील आणि त्यांच्यासाठी आवाज उठवतच राहील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed