• Sat. Mar 7th, 2026

    तू बदनाम कर तेरी औकात जहा तक है! राठोडांच्या मतदारसंघात गवळींचा फोटो असलेले बॅनर

    तू बदनाम कर तेरी औकात जहा तक है! राठोडांच्या मतदारसंघात गवळींचा फोटो असलेले बॅनर

    वाशिम: यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तस तसे हे वाद अजून चव्हाट्यावर येत आहेत.

    वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यातील धुसफूस दिवसागणिक वाढत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात सभा झाली. या सभेच्या जाहिरातीत खासदार भावना गवळी यांचा फोटो नव्हता, तर सभेच्या स्टेजवर बसायला सुद्धा त्यांना मागच्या रांगेत जागा मिळाली होती. आता वाशिम मध्ये पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत भावना गवळींनी लावलेल्या बॅनरवर पालकमंत्री संजय राठोडांना स्थान मिळालेले नाही.

    त्यातच आता गवळींच्या समर्थकांनी थेट राठोडांच्या मतदारसंघात त्यांना इशारा देणारे बॅनर झळकवल्यानं हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. खासदार भावना गवळींच्या समर्थकांनी संजय राठोडांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या दारव्हा शहरात ‘मत पुछ मेरे नाम की पहचान कहाँ तक है, तू बदनाम कर तेरी औकात जहा तक है,’ असा मजकूर लिहिलेले पोस्टर गवळींच्या फोटोसह लावले होते. मात्र पालिकेनं ते रातोरात हटवले. यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत राजकारण चांगलंच तापण्याची चिन्ह दिसत आहेत.
    मविआ बॅकफूटवर, पण ठाकरे भिडणार, शिंदेंना वरचढ ठरणार; सर्व्हे आला, कोणाला किती जागा?
    वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघात उमेदवारीसाठी विद्यमान खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड दोघेही शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा करत आहेत. भावना गवळी सलग पाच वेळा विजयी झाल्याचा हवाला देत सहाव्या टर्मसाठी उमेदवारी पक्की असल्याचं सांगत आहेत, तर संजय राठोडही पक्षानं आदेश दिल्यास माझी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं सांगत आहेत. या दोघांच्याही दाव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.

    भावना गवळी आणि संजय राठोड यांचा वाद काही आजचा नाही. २०१९ च्या निवडणुकीआधीही असंच नाराजी नाट्य रंगलं होतं. दोघांनीही जाहीर सभेत एकमेकांवर टीका केली होती. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करत समझोता घडवून आणला होता. मात्र लोकसभेची निवडणूक जिंकताच भावना गवळी राठोडांच्या विरोधात आक्रमक झाल्या होत्या. महाविकास आघाडी सोबत सत्ता स्थापन करताना त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून संजय राठोडांना मंत्रिपद देऊ नका अशी मागणीही केली होती. मात्र तरीही ते मंत्री झाले. पण पूजा चव्हाण प्रकरणामुळे गवळींना आयतं कोलीत सापडलं आणि त्यांनी राठोडांना थेट विरोध करायला सुरुवात केली. या आधी उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करून भांडण मिटवलं होतं. मात्र आता एकनाथ शिंदे तसं करताना दिसत नाही.
    पंधरा विद्यमान खासदारांचं तिकीट धोक्यात, भाजपच्या ३२ संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी व्हायरल
    पंतप्रधान नरेंद मोदी यवतमाळमध्ये आलेले असताना या कार्यक्रमाच्या जाहिरातीत भावना गावळींना स्थान नव्हतं. तर आता वाशिममध्ये झालेल्या महिला मेळाव्याच्या बॅनरवर संजय राठोडांना जागा मिळाली नाही. इतकंच नाही तर राठोडांनी पालकमंत्री असूनही बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा अनावरणाच्या शासकीय कार्यक्रमालाही उपस्थिती लावली नाही. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील हे दोन शिलेदार लोकसभेच्या निवडणुकीत दोघापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी एकमेकांना मदत करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    भावना गवळींविरोधात अँटी इन्कबन्सी असल्याचं म्हणत भाजपही या मतदारसंघावर आपली दावेदारी सांगत आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी सुद्धा कंबर कसली आहे. भावना गवळी या सलग पाच वेळा या मतदार संघातून निवडून आल्या आहेत. मात्र आता महायुतीतील मित्र पक्ष या मतदारसंघावर दावा करत असताना शिंदे सेनेतील दोन बड्या नेत्यांमधील वाद विकोपाला जाता असताना आता राठोड-गवळींचं भांडण मिटतं की त्यात तिसऱ्याचाच लाभ होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed