निमित्त होते मविप्रच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित ‘नवीन शैक्षणिक धोरण : आनंदशाळा’ या कार्यशाळेचे. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना राज्य शासनाने शिक्षणच्या क्षेत्रात घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. मंत्री पाटील म्हणाले, की नवीन शैक्षणिक धोरणाविषयी बागूलबुवा निर्माण केला जात आहे. तो काढून टाका. रोजगारनिर्मितीसाठी सक्षम असणाऱ्या अभ्यासक्रमांच्या निर्मितीला पर्याय नाही. यावर सरकारचा भर आहे. मध्यंतरी ३३ महिने सत्तेत असणाऱ्या सरकारने अजब धोरण ठरविले. त्या (महाविकास आघाडी) सरकारने केंद्र जो निर्णय घेईल त्याला विरोधासाठी विरोध करण्याचे धोरण पश्चिम बंगालच्या प्रेरणेतून स्वीकारले. त्यामुळे या काळात नवीन शैक्षणिक धोरणाविषयी शब्दसुद्धा निघाला नाही, हे दुर्दैव आहे.
दरम्यान, राज्य सरकारने शिक्षणात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता ग्रामपंचायतीपासून तर मंत्रालयापर्यंत प्रत्येक सरकारी कार्यालयात आंतरसासियता (इंटर्नशीप) करण्याची संधी मिळेल, असा निर्णय सरकारने घेतला आहे. आणखी एका निर्णयानुसार मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. त्याचा अध्यादेशही लवकरच निघणार आहे असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी मंचावर ‘मविप्र’चे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, नवीन शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे सदस्य महेश दाबक, राष्ट्रीय युवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेश पांडे, माजी आमदार व महात्मा गांधी विद्या मंदिरचे डॉ. अपूर्व हिरे, माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, मुंबई विद्यापीठाचे डॉ. मंदार भानोसे, ‘मविप्र’चे अध्यक्ष सुनील ढिकले, विश्वास मोरे आदी उपस्थित होते.
भारतीय तरुणांना जग खुले!
जगातील बहुतांश देशांमध्ये वृद्धांची संख्या वाढीस लागली आहे. त्यांच्या देशाला पुढे नेणारे तरुण हात त्यांच्याकडे नाहीत. ते भारताकडे आहेत. त्यामुळे सर्व क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या भारतीय तरुणांना जगभरात मोठी संधी आहे. जर्मनीसारखे तंत्रज्ञानात अग्रेसर देश व युरोपातील देश भारतीय तरुणांकडे मोठ्या अपेक्षेने डोळे लावून बसले आहेत. भारतीय तरुणांनी जगातील विविध भाषा, आपण स्वीकारलेल्या क्षेत्रातील आवश्यक कौशल्य-अनुभव आत्मसात केल्यास देशातील बेरोजगारीचा प्रश्नही बऱ्याच अंशी कमी होऊन भारतीय तरुणांना जग खुले आहे, असाही विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
सर्वांना हवी एकच गाडी पण…
कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी मिश्कील राजकीय टिप्पण्याही केल्या. इंडिया आघाडीचे नाव न घेता ते म्हणाले, की जितके म्हणून विरोधक आहे त्या सर्वांना एकाच गाडीत बसायचे आहे. बसायचे तर बसू द्या, पण त्यांच्या गाडीला चालकच नाही, असा उपरोधिक टोला त्यांनी विरोधकांना हाणला. कार्यक्रमातून निरोप घेताना ‘मविप्र’चे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्याकडे कटाक्ष टाकत ‘तुम्हाला लोकसभा लढवायची आहे, हे मला माहिती आहे’, असे सांगत मिश्कील हास्य केल्याने सभागृहातील वातावरणही हलक-फुलके झाले.
चिठ्ठीशिवाय प्रवेश नाही
शिक्षणच्या सद्यस्थितीतील अवस्थेविषयी बोलताना ते म्हणाले, की आजवरच्या गत सरकारच्या धोरणांनी शिक्षण सामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. हे चित्र बदलण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. उदाहरणादाखल पुण्यातील एका खासगी विद्यापीठात वार्षिक शुल्क १३ लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. त्या विद्यापीठाचे संस्थापक आमचे जुने मित्र असल्याने तिथे आमच्यासारख्यांची चिठ्ठीच प्रवेशासाठी लागते. केवळ पैसे असूनदेखील भागत नाही. त्यामुळे आम्ही मुलींचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याचा अध्यादेशही निघेल, असेही ते म्हणाले.