• Wed. Mar 11th, 2026

    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी; तुम्हाला ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल- शाहू महाराज

    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी; तुम्हाला ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल- शाहू महाराज

    कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जागे संदर्भात तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर ती एक जबाबदारी सुद्धा असेल, असे म्हणत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार असल्याचे पुन्हा स्पष्ट संकेत दिले आहे. तसेच ब्रेकिंग न्यूज सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल आणि यासाठी मला तुमचं मार्गदर्शन लागणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ते कोल्हापुरात ब्रेकिंग न्यूज पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

    आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी अशी इच्छा महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची आहे.महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने उमेदवार कोण या संदर्भात घोषणा करण्यात आलेले नाही.मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट न्यू पॅलेस येथे जात शाहू महाराजांची भेट घेतली. यामुळे त्यांच्या उमेदवारी संदर्भात चर्चांना उधाण आले होते.

    अशातच दोन दिवसांपूर्वी शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यामुळे मला कोणतेही ऑफर नाही,मात्र येण्याची शक्यता आहे. असे म्हणत सूचक इशारा दिला होता.तर आज कोल्हापुरात ब्रेकिंग न्यूज या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान त्यांनी पुन्हा सूचक इशारा देत आपल्याला उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

    तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. मात्र हे ब्रेकिंग न्यूज कोल्हापुरातून नाहीतर दुसऱ्या गावातून येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल. ऐशोआराम करण्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज नसणार तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल. त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन देखील लागणार आहे.कोल्हापूरच्या चांगल्यासाठी आणि विकासासाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी मी नेहमी तुमच्या सोबत संवाद साधेन. आपण सर्वांनी मिळून काम केलं तर अनेक गोष्टी लवकर होतील, असे ते यावेळी म्हणाले आहेत.

    तसेच कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेलाय असं मला कळतंय. दिल्लीमध्ये काय होईल हे मला माहित नाही मी या दृष्टीने कधीच दिल्लीला गेलो नाही आणि मुंबईलाही गेलो नाही. मी कोल्हापूर मध्ये शांत बसून आहे. मात्र सर्वांची अपेक्षा असेल तर तुमच्यासाठी मी नेहमी उपलब्ध आहे, असे ही ते यावेळी म्हणाले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed