• Mon. Mar 16th, 2026

    मोदींना रोखण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये, खासदार असदुद्दीन ओवेसींचा आरोप, नेमकं काय म्हणाले?

    मोदींना रोखण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये, खासदार असदुद्दीन ओवेसींचा आरोप, नेमकं काय म्हणाले?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘मोदींना तिसऱ्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखण्यासाठी आघाडी तयार करण्यात आली. या आघाडीतील पक्षाचे महाराष्ट्रातील नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. आता पंजाब आणि मध्य प्रदेशातील नेतेही रांगेत आहे. आघाडीच्या पक्षातील नेते हेच भाजपमध्ये जात आहेत,’ अशी तोफ इंडिया आघाडीवर डागून खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ‘धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचा आव आणणारे पक्ष अल्पसंख्याकांवर अन्याय झाल्यानंतर येत नाहीत. मात्र, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मतांची भीक मागण्यासाठी येतील,’ असा आरोपही ओवेसी यांनी केला.

    अकोला येथील सभेत भाग घेतल्यानंतर खासदार ओवेसी शहरात आले होते. हैदराबादला जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले. या वेळी मुंबईत मीरा रोडवर झालेल्या कारवाईचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.

    ‘ही घटना काही राज्यातील ग्रामीण भागांत किंवा इतर भागांत नव्हे, तर मुंबई शहरात घडली आहे. प्रशासनाने एकतर्फी कारवाई करून गोरगरिबांची घरे त्यांची दुकाने पाडली. बुलडोझर कारवाईच्या विरोधात कोणतेही धर्मनिरपेक्ष पक्ष आले नाही. ‘एमआयएम’ने आवाज उठविला आहे. देशभरात सध्या घडत असलेल्या अनेक प्रकरणात हे आघाडीचे पक्ष शांत आहेत. यात सहाशे वर्षे जुने धार्मिक स्थळ पाडण्यात आले. तेव्हाही या पक्षांनी आवाज उठविला नाही. उत्तराखंड राज्यात सीएए लागू करण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत विपक्षामध्ये बसलेल्या लोकप्रतिनिधी एकमत झाले,’ असेही ओवेसी म्हणाले.
    काँग्रेसला आणखी एक धक्का; राजस्थानात पक्षात गळती, माजी मंत्री महेंद्रजीत सिंह मालवीय यांनी भाजपचा हात धरला
    ‘देशभरात अल्पसंख्यांक समाजाविरोधात होत असलेल्या कारवायामुळे अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे,’ असाही दावा ओवेसी यांनी केला.

    इंडिया आघाडीत घेण्याबाबत जलील यांनी आवाहन केले होते. पण आघाडीकडून प्रतिसाद मिळाला नाही. आताही वेळ गेलेली नाही. सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे सूतोवाचही ओवेसी यांनी केले.

    जलील यांच्याबाबत निर्णय लवकरच

    ‘खासदार जलील यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढण्याबाबत इच्छा जाहीर केली आहे. त्यांच्या या इच्छेबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा केली जाईल. त्यानंतर निर्णय होईल. सर्वाधिक सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे तसेच मराठा, धनगर आरक्षण यासह महाराष्ट्राच्या विकासाबाबत प्रश्न विचारणारा संसदपटू म्हणून जलील यांनी नाव कमविले आहे,’ असेही खासदार ओवेसी यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed