• Sun. Mar 15th, 2026

    लोकसभा निवडणुकीआधी महायुतीला मिळणार आणखी एक साथीदार; राज ठाकरे भाजप सोबत जाणार? का सुरू झाली ही चर्चा

    लोकसभा निवडणुकीआधी महायुतीला मिळणार आणखी एक साथीदार; राज ठाकरे भाजप सोबत जाणार? का सुरू झाली ही चर्चा

    मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या ३ पक्षातील फोडाफोडीच्या घडामोडीनंतर आता बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील आहे. राज ठाकरे यांच्या मनसे लवकरच राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.

    मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी भेट झाल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून मनसेला एनडीए आघाडीत सहभागी करून घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपसोबत आघाडी झाल्यानंतर मनसेला राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळू शकते. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात फार बदल झाले आहेत. अशात राज ठाकरे भाजप सोबत येतील ही फक्त चर्चा नाही. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केले होते आणि लवकरच सर्वांना समजेल असे म्हटले होते.

    दरम्यान अशी देखील चर्चा सुरू आहे की, राज ठाकरे दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे आणि आशीष शेलार यांच्यात एका तासापेक्षा अधिक वेळ चर्चा झाली. या भेटीदरम्यान अन्य कोणीही उपस्थित नव्हते.

    मनसेचे मुख्य प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले की, राज ठाकरे आणि आशीष शेलार हे चांगले मित्र आहेत आणि ते नियमीतपणे भेटत असतात. त्यामुळे या भेटीवरून कोणताही अर्थ काढू नये. त्याच बरोबर या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाचा निरोप राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही भेट झाल्याची चर्चा आहे.

    महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ पैकी मनसेकडे फक्त एक जागा आहे. जर मनसे महायुतीमध्ये सहभागी झाले तर पक्षाला विधानपरिषदेची एक जागा दिली जाऊ शकते. तसेच आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा प्रभाव असलेल्या जागा दिल्या जाऊ शकतात. १७ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली होती. गेल्या दोन वर्षात ते अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत दिसले आहेत. टोल प्रकरणी राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सरकारने तातडीने कारवाई केली होती. या शिवाय दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा भेट झाली आहे.
    राज ठाकरे भाजपसोबत आले तर लोकसभेनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. पालिकेच्या २०१२ सालच्या निवडणुकीत मनसेला २७ तर २०१७ साली ०७ जागा मिळाल्या होत्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed