सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडी या दोन तालुक्यांना दुष्काळाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. जत आणि आटपाडी तालुक्यातील ५४ गावं आणि ३९२ वाड्यावर आता टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय. २०१९ आणि २०२१ मध्ये सांगलीमध्ये महापुराने मोठे थैमान घातले. २०२२ आणि २०२३ मध्ये जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे टंचाई भासली नव्हती. परंतु जून आणि सप्टेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ६८ टक्के इतकाच पाऊस झाला. नोव्हेंबरमध्ये अवकाळीने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके वाचली. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी मात्र याचा काही एक उपयोग झाला नाही.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर्षी देखील जत तालुक्यातील ५० आणि आटपाडी तालुक्यातील ४ गावांना ५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याचबरोबर कवठेमहंकाळ आणि खानापूर तालुक्यातील तीन गावात देखील पाणीटंचाई आहे. परंतु या गावात अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. सध्या जत तालुक्यातील एक लाख १९ हजार ९२१ लोकसंख्या असणाऱ्या ५० गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये सांगली जिल्ह्यात पाण्याची तीव्रता अधिक भीषण होणार आहे. त्यामुळे आतापासूनच या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.
म्हैसाळ योजनेपासून तालुका वंचित
दरम्यान, लातूरमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील मिरजेतून रेल्वेद्वारे लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला होता. याच मिरज तालुक्यात म्हैसाळ योजना आहे. मिरजेतून शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या लातूरला रेल्वेने पाणी पोहोचवले जाते. परंतु मिरजेपासून शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जत या गावापर्यंत म्हैसाळ योजनेचा अद्याप पूर्णपणे विस्तार झालेला नाही. म्हैसाळ योजनेचा विस्तार करावा. यासाठी जतमध्ये शेकडो आंदोलने झाली. परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी अद्याप जतपर्यंत पोहोचले नाही.
पाणी मिळत नसल्याने जत तालुक्यातील काही गावे यापूर्वी देखील कर्नाटकात समाविष्ट होण्यासाठी इच्छुक होती आणि ती आज देखील आहेत. एक तर म्हैसाळ योजनेचे पाणी द्यावे अन्यथा कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी जतमधील नागरिकांची पूर्वीपासून आहे. परंतु लवकरच म्हैसाळ योजनेचा विस्तार करून जतला पाणी देण्यात येईल, अशी ग्वाही देत जतमधील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली होती.
आता पुन्हा एकदा जतमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा होतोच. परंतु जतला कायमस्वरूपी हक्काचे पाणी मिळणे गरजेचे आहे. अन्यथा जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या आणि नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या जतमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील टाहो फोडावा लागणार आहे.
कोणत्या गावात टॅंकने पाणीपुरवठा
जत तालुक्यातील निगडी खुर्द, शेड्याळ, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सालेगिरी, पाच्छापूर, कुडनूर, वायफळ, गुगवाड, गिरगाव १, जाडरबोबलाद, काराजनगी, बेळोंडगी, मोकाशेवाडी, टोणेवाडी, सोनलगी, मुचंडी, जालीहाळ खुर्द, कागनरी, दरीबडची, कोळेगिरी, कोंत्येवबोबलाद, लमाणतांडा, केरेवाडी, व्हसपेठ, खैराव, खंडनाळ, गुलगुंजनाळ, करेवाडी, दरीकोन्नूर, सिद्धनाथ, सुसलाद, पांडोझरी, सोरडी, खोजानवाडी, तिल्याळ, गोंधळेवाडी, अंकलगी, मोटेवाडी, भिवर्गी, मल्याळ – प्रत्येकी १ टॅंकर. त्यानंतर सिंदूर, सोन्याळ, संख, उमराणी, तिकोंडी, माडग्याळ – प्रत्येकी २ टॅंकर असे एकूण एकूण ५० टँकर सुरू आहेत. तर दुसरीकडे आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी, पूजारवाडी, विठलापूर – उंबरगाव प्रत्येकी १ असे एकूण ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
