• Fri. Jun 12th, 2026
    बात निकलेगी तो दूर तलक जाएगी, शरद पवारांवर टीका करणाऱ्या दादांना आव्हाडांचा निर्वाणीचा इशारा

    मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत सभेत बोलताना शरद पवार गटावर आणि सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली केली. ‘आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्ष पद मिळालं असतं. काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यात आला असता, असं म्हणताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गहिवरुन आलं. या टिकेला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ”जो नाही झाला काकाचा, तो काय होईल महाराष्ट्राचा” असं म्हणत आव्हाडांनी अजित पवारांचा समाचार घेतला.

    तुम्हाला अधिकृतरित्या अध्यक्ष होण्यापासून कुणी वंचित ठेवलं होतं? तुम्ही आजपर्यंत पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमात सहभागी झालात? पक्षाच्या कुठल्या आंदोलनात सहभागी झालात? असा प्रश्न आव्हाडांनी यावेळी अजित पवारांना केला. तुम्ही फक्त सत्तेसाठी जन्माला आलेला आहात. तुम्ही रस्त्यावर एखादं आंदोलन केलेलं आहे का? आपल्यावर पोलीस स्टेशनमध्ये कोणती पोलीस केस आहे का? तुम्ही फक्त सत्तेचं राजकारण केलं, तेही शरद पवारांचं नाव वापरुन. तुम्ही त्यांच्या रक्ताचे नसलात तरी त्यांच्या रक्तातच होतात, असं म्हणत आव्हाड कडाडले.
    वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्ष माझा असता, अजित पवारांनी सारं बोलून दाखवलं
    तुम्ही १९९१ साली खासदार झाले. १९९३ साली तुम्ही परत आमदार झाले. त्यांच्यानंतर १९९९ सालापासून २०१४ पर्यंत सर्व महत्त्वाची खाती तुमच्याकडे होती. तुमची सर्व बदनामी ही पक्षाला हानीकारक होती. तरीही शरद पवारांनी ती पोटात घातली. ही शरद पवारांची चूक होती. तुम्ही कुठे कुठे काय बोललात, ते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. जितेंद्र आव्हाडांनी असं केलं असतं, तर शरद पवारांनी पक्षात ठेवलं असतं का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. तुम्ही आमच्याबद्दल काय खोटं-नाटं शरद पवारांना सांगायचे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला तेवढेच धंदे होते. मी त्याचा पुरावा आहे. हे सर्व माझ्या बाबतीत घडलेलं आहे.

    छगन भुजबळांनी शपथ घेऊन सांगावं की, अजित पवारांनी ओबीसींचा निधी थांबवला नव्हता. एसटी, एनटी आणि ओबीसी यांचा निधी थांबवण्याचं काम अजित पवारांनी केलेलं आहे. जातीयवाद पाळणारे महाराष्ट्रात जे मंत्री असतील ते फक्त अजित पवार आहेत. शरद पवार नसते तर अजित पवार कुठे असते? आमचं कर्तृत्व होतं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आम्हाला शरद पवारांनी आशीर्वाद दिले. पण आम्ही रस्त्यावरची पोरं होतो. मारामाऱ्या करायचो पोस्टर फाडायचो, पेपर जाळायचो. शरद पवारांविरोधात कुणीही बोललं तरीही आम्ही त्यांच्या अंगावर जायचो. कितीजण तुमच्यामुळे पक्ष सोडून गेले? अशी विचारणा आव्हाडांनी यावेळी केली अजित पवारांना केली.

    तुमचे आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटलांचे किती सुमधूर संबंध होते हे आम्हाला चांगलं माहिती आहे. सत्तेच्या लालचेपोटी तुम्ही एकत्र आले. राहा पण उगाच शरद पवारांना डचायला जाऊ नका, ”बात निकलेगी तो दूर तलक जायेगी”, असं म्हणत अव्हाडांनी अजित पवरांना निर्वाणीचा इशाराही दिला. भाषणाची वेळ आली की, तुम्ही नेहमी पळून जायचे. जेव्हा दिल्लीमध्ये भाषण असायचं तेव्हा तुम्ही बाथरुमध्ये असायचे. जेव्हा जेव्हा शरद पवारांची पॉप्युलॅरिटी हिमालयावर असायची, तेव्हा तुम्ही खालून पीन मारुन पंक्चर करुन टाकायचे. राजीनामा द्यायचे किंवा काहीतरी बोलायचे.
    संसदेत भाषणं करून, पुरस्कार मिळवून प्रश्न सुटत नसतात, अजित पवार यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
    शिखर बँकेमध्ये तुम्ही लोचे केले आणि ते सर्व आलं शरद पवारांवर. त्या प्रकरणात लगेच दु:ख व्यक्त करत तुम्ही राजीनामा दिला. चारवेळा जे उपमुख्यमंत्री पद मिळालं ते फक्त शरद पवारांमुळे मिळालं. हे उपकार मनात तरी ठेवा. कृतज्ञता तरी व्यक्त करा. एवढा कृतघ्न माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेलाच नाहीय. परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं. तुम्ही त्यांच्या भावाचा मुलगा होतात म्हणून तुम्हाला सर्व मिळालं आणि तुम्हाला सर्व गोष्टीत माफ केलं. आमच्यासारख्या मागास व्यक्तीने असं केलं असतं तर लाथ मारून आम्हाला पक्षातून हाकललं असतं. हे सर्व बोलायला मला वाईट वाटतं. एवढे वर्ष काम करुनसुध्दा या माणसाला शरद पवारांची ओळख पटली नाही. काय ते बाबाबा….काय ते काकाका…., तुमचा एक निर्णय असा सांगा की त्याचा फायदा महाराष्ट्राला झाला, असा सवाल करत आव्हाड गरजले.

    तुम्हाला फक्त सुप्रमा जमलं. तुम्ही नावाच्या मागे सुप्रमा लावा. जो नाही काकाचा, जो नाही बहिणीचा, जो नाही काकींचा, ज्या माऊलीने तुम्हाला खायला घातलं, तो काय होणार महाराष्ट्राचा. उत्तर आम्हालाही देता येतं. फक्त साहेबांवर बोलणं टाळा, ही विनंती करतो. तुम्ही जेवढं थुंकतात तेवढं तुमच्या तोंडावर पडतंय. ८४ वर्षांच्या म्हाताऱ्याला तुम्ही असं टोचून बोलणार असाल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीय, असंही जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed