मॉरिस नोरोन्हा महापालिकेची निवडणूक लढवण्यास उत्सुक होता. करोना संकटकाळात, लॉकडाऊनमध्ये त्यानं गरजूंना मदत केली होती. या समाजकार्याच्या आधारे राजकारणात नशीब आजमवण्याचा त्याचा मानस होता. शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत तुझी भेट घालून देतो आणि महापालिका निवडणुकीत तुला तिकीट मिळवून देण्यात मदत करतो, असं आश्वासन अभिषेक यांनी मॉरिसला दिलं होतं, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं होतं.
८ फेब्रुवारीला मॉरिसनं बोरिवली पश्चिमेकडील आय सी कॉलनीतील स्वत:च्या कार्यालयात अभिषेक यांना बोलावलं होतं. आपल्यातील मतभेद मिटल्याची माहिती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांना देऊ असं सांगून मॉरिस अभिषेक यांना कार्यालयात घेऊन गेला. लाईव्ह सुरू असताना मॉरिसनं अभिषेक यांच्यावर गोळीबार केला. त्यासाठी त्यानं अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचं पिस्तुल वापरलं. गेल्या काही महिन्यांत मॉरिसला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होता का, त्यामुळेच त्यानं अंगरक्षक नेमका होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
मॉरिस आणि अभिषेक यांच्यात वाद होते. करोना कालावधीत मॉरिसनं गरजूंना बरीच मदत केली. त्याच्या कामाची दखल बऱ्याच माध्यमांनी घेतली. पण जून २०२२ मध्ये त्याला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली. ४८ वर्षीय गृहिणीनं मॉरिसविरोधात तक्रार दाखल केली होती. बलात्कार, फसवणूक, ब्लॅकमेलिंग, धमकीचे आरोप तिनं केले होते. त्यामुळे मॉरिसविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली. या महिलेला अभिषेक यांनी पाठबळ दिलं होतं.
२०२२ मध्येच अभिषेक यांची पत्नी आणि माजी नगरसेविका तेजस्वी यांनी मॉरिस विरोधात तक्रार नोंदवली. फेसबुक लाईव्ह दरम्यान आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप तेजस्वी यांनी केला. यानंतर वकील श्रेया तिवारी आणि महेश वासवानी यांनी तेजस्वी यांना १०० कोटींची कायदेशीर नोटिस पाठवली. तक्रार मागे घ्या आणि माफी मागा, अशी मागणी नोटिशीतून करण्यात आली.
मॉरिस आणि अभिषेक यांच्यात काही व्यवहार झाले होते का याचा तपास सुरू आहे. मॉरिस यांच्यावर आरोप करणाऱ्या गृहिणीचा जबाब नोंदवला जात आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली.
मॉरिस एक चांगला माणूस होता. करोना काळात त्यानं गरजूंना मदत केली. धान्य आणि आवश्यक वस्तूंचं वाटप केलं. मुख्यमंत्री, राज्यपालांसह अनेकांनी त्यावेळी मॉरिसचा सन्मान केला होता, अशी माहिती मॉरिसची पत्नी सरीनानं दिली. मॉरिस लोकांना मदत करायचा. पण अभिषेक यांनी त्याची प्रतिमा एक गुंड म्हणून तयार केली. मॉरिसवर झालेल्या गंभीर आरोपांचा परिणाम आमच्या कुटुंबावर झाला. आमच्या ११ वर्षीय मुलीच्या मनावर आघात झाला. मॉरिसच्या विवाहबाह्य संबंधांची मला कल्पना नव्हती. त्याच्या विरोधात एफआयआर झाल्यानंतरच मला याबद्दल समजलं, असं सरीना म्हणाल्या.