• Sat. Sep 21st, 2024
कोल्हापूरसह सांगली जिल्हा पूरनियंत्रणासाठी चार हजार कोटींचा निधी मंजूर, राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करणे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी मित्रा संस्था कार्यालय, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

महापुराचा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक फटका
कोल्हापूर जिल्ह्याला आतापर्यंत १९८९, २००५, २०१९ आणि २०२१ या वर्षात महापुराचा मोठा फटका बसला. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. महापूर आलेल्या प्रत्येक वर्षी पाण्याची पातळी वाढतच गेली. महापुराचा सर्वाधिक फटका हा कोल्हापूर, इचलकरंजी, शहरासह करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यातील अनेक गावांना बसतो. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याचे अतोनात नुकसान होते. त्याचबरोबर महापुराने पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग काही दिवस बंद राहतो. कोल्हापूर शहरात बहुतांश भागात पुराचे पाणी शिरल्याने निम्म्याहून अधिक शहर जवळपास ठप्प होते यासह कोल्हापूर कोकणाला जोडणारे राज्यमार्गही बंद होतात. यामुळे पूर नियंत्रण यंत्रणा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात राबवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

वर्ल्ड बँकेकडून पूर नियंत्रण नियंत्रणासाठी चार हजार कोटी रुपये मंजूर
या सर्व पार्श्वभूमीवर महापूर नियंत्रणाबाबत उपायोजना करण्यासाठी महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा महत्वाकांक्षी प्रकल्प आराखडा जलसंपदा विभागामार्फत करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण करणे व पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्याच्या इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणे असे दोन टप्पे करण्यात आले आहेत. यातील पहिल्या टप्प्यास आवश्यक निधीस जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. मंजूर चार हजार कोटी निधीतून पहिल्या टप्प्यात पूर नियंत्रणाची कामे, उड्डाणपूल बांधणे, भूस्खलन उपाययोजना, वीजवाहक तारा स्थलांतरीत करणे, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसास्थळे संरक्षित करणे, पुराची पूर्वकल्पना देणे, आपत्ती व्यवस्थापन उपकरणे खरेदी करणे, पूरसंरक्षक उपाययोजना आदी कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये ७० टक्के हिस्सा जागतिक बँकेचा असून ३० टक्के योगदान राज्य शासनाचे असणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या टप्प्यात महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून यासंदर्भात मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मित्रा संस्था कार्यालय, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राजेश क्षीरसागर उपाध्यक्ष मित्रा संस्था, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह देसाई, जागतिक बँकेचे प्रतिनिधी व संबधित विभागांच्या प्रमुखांची आढावा बैठक पार पडणार असल्याचे ही राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed