अनेक नवजातांची टाळू जन्मत:च फाटलेली असते. त्यामुळे अशी मुले जेव्हा दूध पितात त्यावेळी ते फाटलेल्या टाळुतून नाकावाटे बाहेर येते किंवा मग श्वास नलिकेद्वारे फुफ्फुसात जाते. त्यामुळेच अशा बाळांचे पोषण व्यवस्थित होऊ शकत नाही. दहा वर्षांपूर्वी डॉ. दातारकर एका फेलोशीपसाठी अमेरिकेत गेले असता तेथील लहान मुलांच्या रुग्णालयात या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी अशा मुलांसाठी बाटलीतून येणारा दुधाचा प्रवाह आणि तोंडातील दाब कसा नियंत्रित करता येईल, याचाही विचार झाला. हा दाब व प्रवाह नियंत्रित करता आला तर बाळाच्या तोंडात जाणारे दूध थेट अन्ननलिकेवाटे त्याच्या पोटात जाऊ शकेल, मात्र त्यावर नियंत्रण नसले तर ते टाळुतून नाकावाटे बाहेर येईल. सर्वसाधारण बाळात टाळू बंद असल्याने ते सरळ पोटात जाते. त्यामुळे अशा बाळांसाठी विशेष बाटली तयार करण्याची कल्पना डॉ. दातारकर यांना सुचली.
नागपूरला आल्यावर त्यांनी व्हीएनआयटीच्या तज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली व आपली संकल्पना सांगितली. त्यानुसार व्हीएनआयटीच्या डॉ. रश्मी उद्दनवाडीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करून ही वैशिष्ट्यपूर्ण बाटली तयार केली. बाळाच्या तोंडाऐवजी मशीनचा उपयोग करून त्यातून किती प्रमाणात कशा पद्धतीने दूध ओढले तर ते टाळुतून आत जाणार नाही, याची निरीक्षणे नोंदवून ही बाटली तयार करण्यात आली. यात बाटली आणि निप्पल यांच्यामध्ये धातूच्या गोलाकार चकत्या टाकण्यात आल्या आहेत. पाच प्रकारच्या या चकत्यांवर १ ते ९ या संख्येत छिद्रे केली आहेत. या चकत्या निप्पलच्या आधी बसवून मग बाळाला दूध पाजण्यात येते.
फाटलेल्या टाळूचे प्रमाण पाहून किती छिद्रांची चकती बाटलीत बसवायची हे ठरविले जाते. या चकतीमुळे दुधाचा प्रवाह व दाब नियंत्रित होऊ शकतो. हे संशोधन ५ वर्षापूर्वीच पेटंटसाठी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले होते. आता त्याला मान्यता मिळाली आहे.
सर्वसाधारण बाळात तोंडात दूध ओढण्याची क्षमता ५० ते १७० एमएमपर्यंत असते, पण टाळू फाटलेल्या मुलांमध्ये ती २० एमएम राहते. त्यामुळे त्यांच्या पोटात कमी दूध जाते व त्याचा त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. या वैशिष्ट्यपूर्ण बाटलीमुळे ही समस्या दूर होणार आहे. साधारणत: १ हजार मुलांमागे एकात ही समस्या असते. ओठ फाटले असले तर तीन महिन्यानंतर आणि टाळू फाटली असेल तर नऊ महिन्यांनंतर शस्त्रक्रिया करता येते. त्यामुळे शस्त्रक्रिया होईपर्यंत त्याला व्यवस्थित दूध पिता यावे, यासाठी हा शोध महत्त्वाचा मानला जातो.
दंत महाविद्यालयाचे डॉ. सुरेंद्र डवरे यांनी या संबंधातील क्लिनिकल कार्य केले तसेच त्यांनी यावर लिहिलेल्या शोधनिबंधाला पारितोषिकही मिळाले होते. या बाटलीच्या पेटंटसाठी व्हीएनआयटीच्या डॉ. रश्मी उद्दनवाडीकर व डॉ. ए.एम. कुथे यांनी अर्ज केला होता. त्यांच्यासहच सुखदा जोशी, जुगल शाह, अपूर्वा शर्मा, अनीश काळे आणि डॉ. अभय दातारकर यातील इनव्हेन्टर होते. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत हे तयार केले असून, भविष्यात या बाटलीचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन केले जाऊ शकते, असे अधिष्ठाता डॉ. दातारकर यंनी ‘मटा’ला सांगितले.