• Sat. Sep 21st, 2024
ज्याने घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या त्याची CM शिंदे यांच्याशी भेट, पक्षप्रवेशाचं आमंत्रण : राऊत

मुंबई: अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या वेळी अभिषेक हे फेसबुकवर लाईव्ह होते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर दुसरीकडे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मॉरिस भाईनेही आत्महत्या केली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
त्याच्यामुळेच तुरुंगात गेलो, मॉरिस भाईच्या डोक्यात राग, तुरुंगाबाहेर पडून प्लॅन आणि फेसबुक लाईव्हमध्ये खेळ खल्लास
दरम्यान आता या घटनेवर अनेक प्रतिक्रिया येत आहे. संजय राऊतांनी ही ट्विट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात. पक्षात प्रवेश देतात. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलीस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे. अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय..आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत! फडणवीस राजीनामा द्या!, असं ट्विट त्यांनी केले आहे.

तर संजय राऊतांनी त्यांच्या अजून एक ट्विटमध्ये देवेंद्र फडणविसांकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात गुंडा राज!

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश narohna चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले! (वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणविस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी! राजीनामा द्या!

महेश गायकवाड यांच्या प्रकरणानंतर अभिषेक घोसाळकरांना गोळ्यांनी लक्ष्य, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

यानंतर जितेंद्र आव्हाडांनीही यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात लागोपाठ उघडपणे गोळीबाराच्या घटना घडणं, ही अतिशय गंभीर बाब आहे. ‘सागर’ बंगल्यावर बसलेल्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो. सरकार कुणाचंही असो पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल युपी/बिहारच्या दिशेने होणं ही इथल्या प्रत्येकासाठी शरमेची बाब आहे. जिथे राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे जनतेच्या सुरक्षेची काय गॅरंटी असणार..?, अशा शब्दात आव्हाडांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

घटनेबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, फेसबुक लाईव्हवर एका लोकप्रतिनिधीवर गोळीबार होतो यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते ? शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी आहे. एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे. अशा बातम्या पूर्वी फक्त बिहार आणि उत्तरप्रदेश मधून यायच्या. आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष आपल्या राज्यात बघत आहे. राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. राज्यात काय सुरू आहे याची जाणीव तरी सत्ताधाऱ्यांना आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed