• Fri. Mar 13th, 2026
    ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, मनोज जरांगेंनी एक ओबीसी-लाख ओबीसी म्हणावं : पंकजा मुंडे

    बीड : सरकारने अधिसूचनेचा मसुदा काढला आहे. ज्यात कुणबी नोंद असेलल्यांच्या सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय चांगला घेतला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली पण दुसऱ्या बाजूला जे मराठा कुणबी म्हणून ओबीसीत आले त्यामुळे नाही म्हटलं तरी ओबीसीला धक्का लागलाच आहे, अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली. तसेच मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे. त्याचवेळी आता मनोज जरांगेंनी एक ओबीसी-लाख ओबीसी म्हणावं, असा चिमटा काढत जरांगे यांनी आता व्यापक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी वाशी येथे उपोषण सोडलं. मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत असलेल्या मराठा आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच रोखण्यात सरकारला यश आलं. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करण्याचे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी जाहीर केल्यानंतर सरकार आणि प्रशासन अधिक वेगाने सक्रिय झाले. ओबीसी अंतर्गत जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रचलित कार्यपद्धतीची नव्याने मांडणी करणारी प्रारूप अधिसूचना (शासकीय अध्यादेश नव्हे) जारी करून मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन संपविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले. या साऱ्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    कुणबी म्हणून ओबीसीत आले, नाही म्हटलं तरी ओबीसीला धक्का आहेच

    मराठा समाजासाठी सकारात्मक निर्णय झाला. या निर्णयानं मराठा समाजाची एक पिढी ओबीसीमध्ये आली असून त्यांचे ओबीसीत स्वागत आहे. मराठा समाजातील कुणबी म्हणून जी संख्या ओबीसीत समाविष्ट झाली त्यामुळे ओबीसीत थोडी गर्दी होणार आहेच. त्यामुळे नाही म्हणलं तरी हा ओबीसीला धक्का आहे, असं स्पष्टपणे म्हणताना मुंडे साहेबांपासून आपली एकच भूमिका आहे की ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्यावे, मात्र कुणबी म्हणून ओबीसीत समावेश झाल्यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा गुंतागुंतीचा होणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

    मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, सरसकट प्रमाणपत्र देण्याच निर्णय घेतला नाही ; ॲडव्होकेट विशाल कदम यांची टीका

    मराठा ओबीसी वितुष्ट निर्माण होऊ नये

    मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले याचा वेगळा विजय साजरा करून मराठा व ओबीसीमध्ये वितुष्ट येईल अशा पद्धतीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. मराठा व ओबीसी मध्ये काहीसे वितुष्ट निर्माण झाल्याचे चित्र निर्माण केले जात असताना छत्रपती उदयनराजे आणि मी बहीण भावाच्या नात्याने एकत्र हे चित्र सकारात्मक आहे, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

    त्या विधानाकडे केवळ प्रेम म्हणून बघते

    साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या स्वागताने मी भारावून गेले. माहेरी गेल्याप्रमाणे माझे तिथे स्वागत झाले. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून निवडणूक लढवावी असे जे सांगितले त्याचा मी सन्मान करते. ते एक प्रेम आहे. त्याच्याकडे राजकीय अर्थाने बघत नाही, असं त्या म्हणाल्या.

    सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालेलं नाही, एकनाथ शिंदेंकडून फसवणूक; विनायक राऊतांचा आरोप

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed