• Sun. Sep 22nd, 2024

संकल्प यात्रा, लोकांमध्ये विकसित भारत @२०४७ चे उद्दिष्ट साध्य करू शकत असल्याचा विश्वास निर्माण करेल – प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा

ByMH LIVE NEWS

Jan 4, 2024
संकल्प यात्रा, लोकांमध्ये विकसित भारत @२०४७ चे उद्दिष्ट साध्य करू शकत असल्याचा विश्वास निर्माण करेल – प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा

मुंबई, 4 जानेवारी 2024 : पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी आज मुंबईत गोरेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा माहिती, शिक्षण आणि संपर्क (आयईसी) कार्यक्रमाला भेट दिली. या कार्यक्रमात मिश्रा यांनी काही लाभार्थ्यांसोबत संवाद साधला आणि त्यांना विविध सरकारी योजनांच्या लाभार्थी पत्रिका वितरित केल्या.

यावेळी बोलताना मिश्रा म्हणाले की प्रधानमंत्री स्वतः विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत आठ वेळा सहभागी झाले आहेत. एकही लाभार्थी वंचित राहणार नाही अशा प्रकारे प्रत्येकापर्यंत लाभ पोहोचवण्याच्या ‘संतृप्तता दृष्टीकोनासह’ विकासकार्ये करणे सुनिश्चित करण्याचा आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक भारतीयाने भारताला 2047 पर्यंत विकसित बनवण्याचा संकल्प केला पाहिजे, असे ते म्हणाले. 2047 पर्यंत  भारताला विकसित देश बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन आहे आणि यामध्ये केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे तर सर्व नागरिक सहभागी होतील, असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त केला. ही संकल्प यात्रा लोकांमध्ये  विकसित भारत@ 2047 चे उद्दिष्ट साध्य करत असल्याचा विश्वास निर्माण करेल, असे त्यांनी सांगितले

विकसित भारत संकल्प यात्रा हे जन भागिदारीचे प्रतीक बनले आहे असे ते  म्हणाले. जनभागीदारी किंवा लोकसहभागामुळे देशाला मागील काळात  मोठी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत झाली आहे. स्वच्छ भारत आणि हर घर तिरंगा यांसारख्या मोहिमा आणि कोविड-19 व्यवस्थापन हे सगळ्या  नागरिकांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे यशस्वी झाले असे ते म्हणाले. आजपर्यंत, 9 कोटी लोक विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले आहेत आणि दिवसेंदिवस अधिकाधिक लोक या संकल्प यात्रेत सहभागी होत आहेत.विकसित भारत संकल्प यात्रा  आत्तापर्यंत 1.5 लाखांहून अधिक ग्रामपंचायती आणि नगरपालिका क्षेत्रात पोहोचली आहे असे त्यांनी नमूद केले

सरकारी योजनांनी  जीवनात ज्याप्रकारे  बदल घडवून आणला त्याविषयी लाभार्थ्यांचे अनुभव ऐकून त्यांनी आनंद व्यक्त केला. या यात्रेतील  ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ अंतर्गत  काही लाभार्थ्यांनी पीएम मुद्रा योजना, पीएम स्वनिधी, पीएम एफएमई, आयुष्मान भारत आणि इतर योजनांनी त्यांच्या जीवनात कशाप्रकारे  सकारात्मक बदल  आणला याबद्दल त्यांचे अनुभव कथन केले. विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये  मुंबईच्या विविध भागांमध्ये लोक  उत्साहाने  मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याबद्दल  आणि महाराष्ट्रातील लोक राज्यभरात मोठ्या प्रमाणात विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये  सहभागी होत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली , असे मिश्रा यांनी सांगितले.

मुंबईत  गोरेगाव पूर्व येथे विकसित भारत संकल्प यात्रा आयईसी  कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल पी.के मिश्रा यांनी आनंद व्यक्त केला.याबद्दल त्यांनी स्थानिक मंत्री, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, प्रशासक आणि परिसरातील जनतेचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये महाराष्ट्र सरकारचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष  मंत्री   मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त  इक्बाल सिंह  चहल आदींचा समावेश होता.

* * *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed