• Sat. Sep 21st, 2024

देशाने गमावले १७७ वाघ; मागील १२ वर्षांतील सर्वाधिक मृत्यू, कोणत्या राज्यात प्रमाण अधिक?

देशाने गमावले १७७ वाघ; मागील १२ वर्षांतील सर्वाधिक मृत्यू, कोणत्या राज्यात प्रमाण अधिक?

चंद्रपूर : सरत्या वर्षात देशाने १७७ वाघ गमावले असून, २०२३ हे मागील १२ वर्षांतील सर्वाधिक व्याघ्रमृत्यूचे वर्ष ठरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात महाराष्ट्र आघाडीवर असून, राज्यात ४५ वाघांचा मृत्यू झाला आहे.

संपूर्ण देशभरात २०२२च्या व्याघ्रगणनेनुसार तीन हजार १६७ वाघांची नोंद झाली आहे. एकेकाळी देशात संकटग्रस्त ठरू पाहणारी वाघांची प्रजाती आणि मोठ्या संख्येने आता वाढत असलेली वाघांची संख्या हे आशादायी चित्र या अलीकडे आलेल्या व्याघ्रगणनेत दिसून आले आहे. पण देशाने २०२३ या वर्षात वर्षभरातील आजवरचे सर्वाधिक १७७ वाघ गमावले आहेत. त्यातील मृत्यू हे वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकारीत, वा नैसर्गिकरीत्या अशा विविध कारणांनी झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ४५, मध्य प्रदेशात ४०, तर कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यात प्रत्येकी १४ वाघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मागील १२ वर्षांत सर्वाधिक १२७ वाघांचा मृत्यू हा २०२१मध्ये झाला होता. त्यानंतर प्रथमच त्यावर ही संख्या गेली आहे.

वाघांच्या अपघात व शिकारीच्या घटना सुरूच असल्याने तो चिंतेचा विषय मानला जात आहे. या वर्षी देखील शिकारीच्या घटना समोर आल्या असून, काही प्रकरणातील चौकशी जारी आहे.

गेल्या काही वर्षांत वाघांसह अन्य वन्यप्राण्यांच्या वास्तव्यक्षेत्राचा संकोच झाला असून छोट्या भागात त्यांना अधिक संख्येने राहावे लागते. त्या तुलनेत मानवी लोकसंख्या मात्र वाढत आहे. मानवी विकासामुळे त्यांच्या वास्तव्याचेही विभाजन झाले आहे. त्यातून मानवाचे वास्तव्य वाढत असल्याने मानव आणि वन्यजीवांतील संघर्ष वाढण्याच्या शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

पाच वर्षांत देशाने गमावले ६२७ वाघ

मागील पाच वर्षांत ६२७ वाघांचा मृत्यू विविध कारणांनी झाला आहे. दरम्यान, राज्यात शिकारीच्या घटना समोर आल्या असल्या, तरी मागील वर्षात शिकारीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसला आहे. वाघांच्या संरक्षणात गेल्या तीन वर्षांमध्ये मध्य प्रदेशची कामगिरी यंदा थोडी सुधारली आहे. मागील वर्षी ४२ वाघांचा मृत्यू झाला होता. यंदा ४० वाघांचा मृत्यू मध्य प्रदेशात झाला आहे. उर्वरित व्याघ्रबळी हे इतर राज्यांत झालेले आहेत.
नागपुरात निष्काळजीपणाचा कळस! मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या सरासरीत अव्वल, NCRBच्या अहवालातील माहिती
२०२३मधील वाघांचे मृत्यू
राज्य मृत्यू

महाराष्ट्र : ४५
मध्य प्रदेश : ४०
कर्नाटक : १४
केरळ : १४
तामिळनाडू : १४

देशात पाच वर्षांत वाघांचे मृत्यू
वर्षे मृत्यू

२०१९ : ९६
२०२० : १०६
२०२१ : १२७
२०२२ : १२१
२०२३ : १७७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed