भंडारदरा परिसरात ३१ डिसेंबरच्या रात्री येऊन तंबूत राहणाऱ्यांची संख्या मोठी असते. जंगल भटकंती आणि रात्री तंबूत मुक्काम करण्याकडे पर्यटकांचा कल असतो. यासंबंधी पोलिस आणि वन विभागाने तंबू आणि पर्यटकांना इतर सुविधा देणाऱ्या व्यावयायिकांची बैठक घेतली. पर्यटकांकडून आवास्तव पैसे घेऊ नयेत, तंबूत मुक्कामासाठी येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवावी. त्यांचे ओळखपत्र, संपर्क क्रमांक, वाहन क्रमांक नोंदवून घ्यावेत अन्यथा तंबूचा व्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पर्यटकांसाठीही नियम करण्यात आले आहेत. रात्री जंगलात फिरता येणार नाहीत. रात्री अकरा नंतर तंबूत कोणत्याही प्रकारचे संगीत वाजविता येणार नाही. पोलिसांकडून वारंघुशी फाटा, रंधा धबधबा, वाकी फाटा व राजूर येथे पर्यटकांसाठी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. मद्य व अंमली पदार्थ आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
काही पर्यटक येथे गोंधळ घालतात, त्यामुळे इतरांनाही त्रास होतो. निसर्गातील शांतता भंग होऊन नव्य प्राण्यांनाही त्यांची झळ पोहचते. वाहतुकीची कोंडी होते, स्थानिक जनजीवनावर परिणाम होतो. यामुळे पोलिसांतर्फे विशेष काळजी घेण्यात येते. त्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. पर्यटकांनी आनंद लुटण्यासाठी या भागात यावे, स्वत:सह इतरांच्याही आनंदाची आणि सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन राजूर पोलिसांनी केले आहे. नियमभंग करणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News