नवी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेत परतलेल्या मुलांमध्ये पाठदुखीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाठदुखी टाळण्यासाठी दप्तराचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. पाठदुखीचा संबंध प्रौढांशी जोडला जात असला, तरी मुलांमध्येही ही समस्या सर्रास आढळून येते. पाठीवरील दप्तराचे ओझे, वर्गात किंवा घरी बसण्याची अयोग्य पद्धत आणि वारंवार फोन किंवा टॅबलेटचा वापर या गोष्टीदेखील तितक्याच कारणीभूत ठरतात. दप्तराचे वजन इयत्ता पहिली आणि दुसरीमधील मुलांसाठी १.५ ते दोन किलो, तिसरी ते पाचवीमधील मुलांसाठी दोन ते तीन किलो, सहावी ते आठवीच्या मुलांसाठी तीन ते चार किलो, तर इयत्ता नववी आणि दहावीच्या मुलांसाठी पाच किलो वजनाचे दप्तर शारीरिक क्षमतेनुसार योग्य आहे. तरीदेखील कोवळ्या मुलांच्या पाठीवर जितके वजन कमी असेल तितके चांगले, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुलांनी दप्तर योग्यरित्या अडकवले आहे का, फोन किंवा टॅबलेट वापरताना बसण्याच्या योग्य पद्धतीचा वापर करतात का, मुलांचा आहार जीवनसत्त्व ‘ड’ आणि कॅल्शियमयुक्त आहे का, याकडे पालकांनी लक्ष द्यावे. मुलांच्या आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुलांना पाठदुखीचा त्रास होत असेल, तर त्यांच्या पाठीवरील ओझे किंवा शाळेत बसण्याच्या स्थितीकडे विशेष लक्ष द्यावे. योग्य जीवनशैलीचे पालन आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन दिल्याने या वेदना प्रभावीपणे दूर होऊ शकतात, असा विश्वास डॉ. भोर यांनी व्यक्त केला.
मेडिकव्हर रुग्णालयाचे डॉ. नितीश अरोरा (बालरोग ऑर्थोपेडिक सर्जन) यांनीही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील जड दप्तराचे ओझे कमी करण्याविषयी मार्गदर्शन केले. दप्तरामध्ये दुहेरी पट्ट्या असाव्यात आणि दोन्ही खांद्यावर समान वजन पेलले जाईल, यासाठी मुलांच्या दोन्ही पट्ट्यांसह दप्तर सहज अडकवता आले पाहिजे, दप्तर कमरेच्या खाली लटकू नये, पाठीच्या एका बाजूला जड दप्तर अडकवल्याने मुलांच्या मणक्यावर ताण येतो, शरीराच्या एका बाजूला अतिरिक्त वजन टाळणे महत्त्वाचे आहे, असे मत डॉ. अरोरा यांनी व्यक्त केले.