• Sun. Mar 15th, 2026

    पुणे, सातारा-सांगलीची तहान भागणार, कोकण सरिता कृष्णेच्या अंगणी? कोकणचे पाणी वळवण्यासाठी ८०० कोटींचा प्रस्ताव

    पुणे, सातारा-सांगलीची तहान भागणार, कोकण सरिता कृष्णेच्या अंगणी? कोकणचे पाणी वळवण्यासाठी ८०० कोटींचा प्रस्ताव

    पुणे: कृष्णा खोऱ्यामधील कुकडी, इंद्रायणी, मुठा, मुळा, नीरा, भीमा, कोयना, कृष्णा या नद्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचे कोकणात वाहून जाणारे १५.११ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी ‘प्रकल्प वर्षा’अंतर्गत कृष्णा खोऱ्यात वळविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केला आहे. यामुळे कोकण खोऱ्यातील (पश्चिमेकडील) पाणी पूर्वेच्या कृष्णा खोऱ्याकडे वळविल्यास पुण्यासह सातारा, सांगली जिल्ह्यांना अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून, संपूर्ण प्रकल्पासाठी आठशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

    पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे

    कृष्णा-भीमा खोऱ्यातील उपलब्ध जलसंपत्ती सध्या त्यावर आधारित शहरी आणि ग्रामीण भागासाठी अपुरी ठरत आहे. इतर खोऱ्यातील अतिरिक्त जलसंचय कृष्णा भीमा खोऱ्यात वळविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदी नाल्यांमधील पाणी कृष्णा खोऱ्यात प्रवाही पद्धतीने पाणी आणण्याच्या प्रस्तावाला तीन वर्षापूर्वी राज्य सरकारने मान्यता दिली. त्यातून जवळपास १५.११ टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले होते. माळशेज घाट ते रायरेश्वरादरम्यान कुकडी, घोड, भीमा, भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा; तसेच गुंजवणी नद्यांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. हा प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

    अंतराळात पिकवलेला टोमॅटो हरवला; ८ महिन्यांनी स्पेस स्टेशनवर सापडला, शास्त्रज्ञ चकित
    कोकणात राज्याचे ५६ टक्के पाणी

    पश्चिमकडे वाहणाऱ्या नदी नाल्यांना पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होते. त्या तुलनेत कोकणात भौगोलिक परिस्थितीमुळे जल सिंचनाच्या मर्यादेमुळे उपलब्ध सर्व पाण्याची साठवण करता येत नाही, असे सिंचन आयोगाच्या अहवालात स्पष्ट केले आहे. कोकणामध्ये राज्याच्या वाट्याचे एकूण ५६ टक्के पाणी असले तरी लाभक्षेत्र सहा टक्के आहे. कोकण भागाच्या तीव्र उतारामुळे धरणे आणि जलाशयासाठी फारशा उपयुक्त जागा नाहीत. पावसानंतर अवघ्या दोन तीन तासांमध्ये पावसाचे सर्व पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. कोकणातील हे पाणी वाया जाते. कोकणातील पाणी कृष्णा खोऱ्याच्या उपखोऱ्यांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. ४३ योजनांद्वारे प्रवाही पद्धतीने हे पाणी देता येऊ शकते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

    माळशेज ते पसरणीपर्यंतचा अभ्यास

    – सह्याद्री पर्वतरांगामधील जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट ते सातारा जिल्ह्यातील पसरणी घाटपर्यंत घाटमाथ्याचा सुमारे ३० किलोमीटरच्या रुंदीच्या पट्ट्याचा अभ्यास केला आहे.

    – यासाठी घाटमाथ्यानुसार, पश्चिमेकडील मुख्य नद्या, उपनद्या, वितरिका; तसेच पूर्वकडील कुकडी, इंद्रायणी, भीमा, नीरा या नद्यांचे खोरे; तसेच पश्चिमेकडील कोयना, कृष्णा या नद्यांचे खोरे याचा विचार केला आहे.

    – प्रकल्पाद्वारे ८४ हजार हेक्टर इतके जास्तीचे क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.

    – अवर्षणग्रस्त भागात टँकरने पाणी पुरवठ्याची गरज नाही

    – ४३ योजनांतर्गत २१ धरणे/वळणबंधारे तसेच २३ कंटूर कालवे प्रस्तावित करून त्यातील पाणी २५ बोगद्यांद्वारे नैसर्गिक उताराने पूर्वेकडील खोऱ्यात सोडण्याचे नियोजन

    – पूर्वेकडे वळविल्याने कोकणातील पूर नियंत्रित करणे शक्य

    प्रकल्पाची नावे योजनांची संख्या पाणी (टीएमसीमध्ये)

    कुकडी -घोड ४ १.३८

    भीमा -भामा- इंद्रायणी ४ ०.८२

    मुळा-मुठा १७ ४.२०

    नीरा १० २.१९

    कोयना ७ ६.०७

    पंचगंगा १ ०.४५

    एकूण ४३ १५.११

    नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed