आदित्य ठाकरे म्हणाले, कोणी ट्रॅक्टर पाण्यात नेऊन बीच सफाई करतं का? त्यांनी पोज देण्याआधी मला फोन करून बीच सफाई कशी करतात हे विचारायला हवं होतं. उगीच ट्रॅक्टर पाण्यात नेऊन स्वतःचं हसं करून घेतलं. मी एवढ्या वर्षांचा सहकारी आहे. एकदा फोन करून आदित्य हे बीच सफाई कशी करतात? तू नेहमी करतो. मला एकदा सांग म्हणाले असते तर मी सांगितलं असतं, असं म्हणून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली.
याबरोबरच आदित्य ठाकरे म्हणाले, सध्या पर्यावरणात अनेक मोठे बदल होत आहेत. त्यामुळे एकाच मोसमात अतिवृष्टी आणि गारांचा पाऊस होतो. त्यामुळे स्थलांतर वाढत आहे. या पार्श्वूमीवर COP च्या परिषदेला गेलो होतो. त्यातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी पर्यावरणीय बदल कसे होत आहेत? त्यावर भूमिका घ्यायला हवी. धोरणं ठरवायला हवीत, असं मत तिथे मांडल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, मी शेतकऱ्यांना भेटतो. त्यावेळी शेतकरी म्हणतात की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला कर्जमुक्ती मिळाली होती. मात्र नवे मुख्यमंत्री झाल्यापासून आम्हाला कसलीच मदत मिळाली नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांना गुजरात आणि दिल्लीच्या वाऱ्या करून वेळ मिळाला, तर ते राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहतील, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.