• Sat. Sep 21st, 2024

खाटीकखान्याप्रमाणेच मुले इंग्रजी शाळेत; मराठीप्रेमी पालक महासंमेलनात भालचंद्र नेमाडे यांचे प्रतिपादन

खाटीकखान्याप्रमाणेच मुले इंग्रजी शाळेत; मराठीप्रेमी पालक महासंमेलनात भालचंद्र नेमाडे यांचे प्रतिपादन

मुंबई : ‘इतरांची मुले इंग्रजी शाळांमध्ये जातात, म्हणून गुरांना खाटीकखान्यात नेतात, तसे आजचे पालक मुलांचा इंग्रजी शाळांत प्रवेश घेतात. मात्र चौथीत गेल्यानंतरही या मुलांना नीट वाचता येत नाही’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी केले.

मराठी अभ्यास केंद्र आणि अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुजाण आणि सजग पालकत्वासाठी आयोजित ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन-२०२३’चे उद्घाटन डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मराठी भाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना नेमाडे बोलत होते. ‘मुलांना येथील समाज, शेती, संस्कृती, संतांचे विचार याविषयीचे ज्ञान मातृभाषेतूनच मिळू शकते. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मातृभाषेतील शिक्षणाशिवाय पर्याय नाही. दुसरी भाषा शिकायची असेल तर ती कामापुरती शिका. मात्र आपल्या भाषेत प्राविण्य असावे’, असेही नेमाडे यांनी नमूद केले.

‘इंग्रजी माध्यमात शिकलेली अनेक मुले बारावी अथवा पदवीपर्यंत टिकतात. मात्र पदव्युत्तर पदवीचे शिक्षण त्यांना झेपत नाही. पदव्युत्तर पदवीला विषयांची समज आणि विचार लागतो. मात्र इंग्रजीत शिकलेल्या मुलांना संकल्पना नीट समजत नाहीत. तुमची स्वतःची मातृभाषा शिक्षणाचे माध्यम नसेल तर मुले वाहवत जातात’, असेही मत नेमाडे यांनी व्यक्त केले. त्यामुळे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून त्यांचे नुकसान करू नका, असेही आवाहन त्यांनी केले.
…तरच शिक्षकांना पगार मिळेल; शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांची वॉर्निंग, कारण काय?
‘मराठी शाळा टिकली नाही, ती जगण्याची, व्यवहाराची, प्रशासनाची भाषा झाली नाही, तर पुढील १०० वर्षांनी आपल्याला कोणी विचारणार नाही. आपली ओळख पूर्णत: लोप पावेल’, अशी खंत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केली.

पुरस्कारांचे वितरण

यावेळी मराठी भाषा आग्रही पुरस्कारांचे नेमाडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ‘अधिवक्ता शांताराम दातार आणि रवींद्र सुर्वे मराठी भाषा आग्रही पुरस्कार’ विभा सुराणा यांना प्रदान करण्यात आला. जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार सुजाता पाटील यांना, दिनू रणदिवे मराठीस्नेही माध्यमकर्मी पुरस्कार पत्रकार नीरज पंडित यांना आणि अशोक नाना चुरी आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार सनी गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.

‘मुर्खपणाचा फटका’

‘मराठी भाषेमध्ये कोणत्याही बाबतीत कमतरता नाही. मराठी जगातली नववी, दहावी भाषा समजली जाते. मात्र आपल्या मूर्खपणामुळेच मराठी पहिली भाषा होऊ शकत नाही. याला कारण मातृभाषेचे महत्त्व कमी होणे आहे. आपण गुलाम असल्याने इंग्रजी बोलतो’, अशीही खंत नेमाडे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed