• Sun. Sep 22nd, 2024

‘कृषक’चे आता कोल्ड स्टोअरेज; लासलगावात आज लोकार्पण, कांद्याची साठवण क्षमता वाढणार

‘कृषक’चे आता कोल्ड स्टोअरेज; लासलगावात आज लोकार्पण, कांद्याची साठवण क्षमता वाढणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कांद्याला दीर्घकाळ टिकविण्याचे भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) तर्फे लासलगावमध्ये कृषक केंद्राच्या माध्यमातून कांदा विकिरणाच्या तंत्रज्ञान उभारण्यात आले होते. मात्र, तेथेच कोल्ड स्टोरेज नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागे. हे लक्षात घेऊन कृषक संशोधन केंद्रातच ३२० मेट्रिक टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज उभारले असून, हळूहळू या क्षमतेत वाढ करण्यात येणार आहे. याचे आज, ८ डिसेंबर रोजी लोकार्पण होणार आहे.

– लासलगाव येथे २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रातर्फे सुरू केलेल्या कृषी उत्पादन संशोधन केंद्राचे सॅटेलाइटद्वारे उद्‌घाटन केले होते.

– या संशोधन केंद्राचा मुख्य उद्देश कांद्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी इरॅडिएशन (विकिरण) तंत्रज्ञानाचा वापर यशस्वी करणे.

– तंत्रज्ञानाच्या आधारे कोणताही खाद्यपदार्थ किंवा पॅकेजच्या वस्तू गॅमा किरण आणि क्ष-किरण इलेक्ट्रॉन किरणांच्या रेडिएशनमध्ये आणली जातात. या प्रक्रियेमुळे कांद्याला अंकुर येत नाहीत. त्यांची सडण्याची शक्यता कमी होते.

– यामुळे कांद्याची साठवण क्षमता वाढते. लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रात हंगामात हजार मेट्रिक टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया होते. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात विकिरण प्रक्रिया केल्यानंतर या कांद्याला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणे आवश्यक असते.

– हा कांदा शहापूर तसेच अंबड येथील काही कोल्ड स्टोरेजमध्ये साठवला जायचा. परिणामी, वाहतूक खर्च वाढत होता. मात्र, तेथेच कोल्ड स्टोरेज झाल्याने ही समस्या सुटणार आहे, अशी माहिती ‘कृषक’चे प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली.

– कोल्ड स्टोअरेजसाठी केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागातर्फे प्रयत्न सुरू होते. ते आता पूर्णत्वास आले असून, संशोधन केंद्राच्या जागेतच याची उभारणी करण्यात आली आहे. त्याची क्षमता हळूहळू वाढविण्यात येणार असल्याचेही समजते.
सब्र का फल मीठा! साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला चांगला भाव, येवल्यातील शेतकऱ्यांनी कमविले १५० कोटी
कांद्याबरोबर आता शेतीमाल व फळेही

लासलगावातील कृषक केंद्र प्रामुख्याने कांद्यासाठी तयार करण्यात आले होते. मात्र, आता कांद्याबरोबरच येथे विविध शेतमाल व फळांवर ती प्रक्रिया केली जात आहे. या प्रकल्पात सध्या आंबा, डाळी, कांदा, कांदा पावडर, मसाल्याचे पदार्थ, आयुर्वेदिक चूर्ण, कलर पेंट, ड्राय भाजीपाला यावर विकिरण होते. दरवर्षी सरासरी ४ हजार मेट्रिक टन शेतमालावर कृषकमध्ये विकिरण प्रक्रिया पार पडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed