• Sat. Sep 21st, 2024
राज्यात अवकाळीने पीकसंकट; ‘या’ जिल्ह्यांना फटका, १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मुंबई: राज्यात दोन दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या आपत्तीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, १६१ जनावरे दगावली आहेत.
सावधान, पुढे धोका आहे! छत्रपती संभाजीनगरात १० महिन्यांत १७३ अपघातबळी, कोणत्या भागात सर्वाधिक घटना?
याशिवाय य़ा पावसाचा व गारपिटीचा १६ जिल्ह्यांना फटका बसला असून तेथील रब्बी हंगामातील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळींब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आडवा झाला आहे. ‘कृषी, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल विभागाच्या वतीने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची सरकारची भूमिका आहे’, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यांनाही या आपत्तीचा फटका बसला असून तेथे ५३ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई, डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड आणि येवला तालुक्यातील २३ हजार ८३३ हेक्टरवरील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस आणि फळ पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

ठाकरे शिवसैनिकांना मदत करत नाहीत; गंभीर आरोप करत नारायण राणेंचा हल्लाबोल

धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, कापूस, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील २ हजार २३९ हेक्टरवरील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अंमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड आणि भडगाव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर अकोले, कोपरगाव, पारनेर, राहता तालुक्यातील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, मका पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed