मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीसाठी १० सप्टेंबरला मतदान होणार होते. मात्र भाजप नेते आशीष शेलार यांनी या निवडणुकीसाठी बोगस मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप केला होता. परिणामी विद्यापीठाने ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली. आता नव्याने मतदार नोंदणी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
विद्यापीठाने निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून ३० ऑक्टोबरपासून मतदार नोंदणीला सुरुवात झाली आहे. तर मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आता केवळ तीन दिवस उरले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत अर्जाची मुदत असल्याने आता केवळ तीन दिवस नोंदणीसाठी उरले आहेत.
या मतदार नोंदणीकडे पदवीधरांनी पाठ फिरवली आहे. विद्यापीठाने सिनेट निवडणूक रद्द केल्यानंतर शिंदे गटाच्या युवा सेनेसह अभाविप, मनविसे, युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्याकडूनही नव्याने जोमाने मतदार नोंदणी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र सर्वच विद्यार्थी संघटनांकडून मतदार नोंदणीसाठी फारशा हालचाली होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
मतदार नोंदणीसाठी तांत्रिक अडचणींचा डोंगर असल्याने सद्यस्थितीत केवळ ७ हजार मतदारांची नोंदणी होऊ शकली आहे, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. यापूर्वी सिनेट निवडणूकीसाठी तब्बल १ लाख १३ हजार पदवीधरांनी नोंदणी केली होती. त्यातून ९० हजार पदवीधरांची नोंदणीची अंतिम यादी तयार झाली आहे. मात्र आधी नोंदणी केलेल्या मतदार नव्याने नोंदणी करण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
मुदतवाढीची शक्यता
विद्यापीठाने २२ नोव्हेंबर, २०२२ रोजी निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. तेव्हापासून अद्याप निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता नव्याने सुरू केलेल्या मतदार नोंदणीलाही अल्प प्रतिसाद मिळाल्याने मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आणखी विलंब?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची मुदत गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये संपुष्टात आली. त्यानंतर तातडीने नवी सिनेट अस्तित्वात येणे अपेक्षित होते. मात्र सिनेट निवडणुकीला विलंब झाला आहे. मतदार नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी करण्याच्या तयारीत विद्यार्थी संघटना असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे हीच स्थिती राहिल्यास प्रत्यक्षात सिनेट निवडणूक होण्यास आणखी विलंब होणार आहे.
‘उत्साह मावळला’
‘गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत सिनेट अस्तित्वात येणे अपेक्षित होते. मात्र विद्यापीठाने निवडणूक प्रक्रियेला विलंब केला. तसेच दबावातून निवडणूक रद्द केली. विद्यापीठाने निवडणूक प्रक्रिया राबविताना संविधानाची पायमल्ली केली. त्यातून आता पदवीधरांमध्येही मतदार नोंदणीसाठी उत्साह राहिला नाही,’ अशी प्रतिक्रिया मनविसेचे राज्य प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी केली.
‘संगणक उपलब्ध करा’
मुंबई विद्यापीठाकडून सिनेटसाठी पदवीधर मतदारांची ऑनलाइन नोंदणी केली जात आहे. मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ऑनलाइन मतदार नोंदणी करताना काही अडचणी येत असतील तर त्यांना कॉलेजमधील संगणक आणि इंटरनेटची वापरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश विद्यापीठाने कॉलेजांना दिले आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News