प्रशांत बाबर यांनी मिलेट सेंटर बारामतीला जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली आहे.सोलापूर जिल्ह्यातील मनुष्यबळ कमी झाल्याचं कारण दिलं जात आहे. सात महिन्यात सोलापूरचं मनुष्यबळ कमी कसं काय झालं? काही लोकं जुलै महिन्यात सरकाररमध्ये येतात आणि लगेचच प्रकल्प कसा जातो, असा सवाल प्रशांत बाबर यांनी केला. अजित पवार हे आमचे ३० जूनपर्यंत नेते होते. भाजपच्या दावणीला जाऊन ते किती खोटं बोलत आहेत. या शासन निर्णयात स्पष्टपणे सोलापूरचा उल्लेख केलेला आहे, असं बाबर म्हणाले. कृषी मंत्री त्यांना चुकीची माहिती देत असतील. कृषीमंत्र्यांनी अजित पवारांवर प्रेम दाखवण्यासाठी हा प्रकल्प बारामतीला दिल्याचं प्रशांत बाबर म्हणाले.
सोलापुरातील राजकीय नेत्यांची उदासीनता
सोलापूरमधून हा प्रकल्प जात असेल तर दुर्दैवाची बाब आहे, असं प्रशांत बाबर म्हणाले. भाजपच्या नेते त्यांच्या नेत्यानं म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं केंद्र वाचवू शकत नाहीत, अशी टीका बाबर यांनी केली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात भाजपचे आठ आमदार आणि दोन खासदार असताना सोलापूर शहर आणि जिल्ह्यावर अन्याय केला जातो आहे. सोलापुरात बेकारी वाढली आहे.अनेक तरुण तरुणी हे रोजगारासाठी पुणे, मुंबईकडे स्थलांतरित होत आहेत. सोलापूरला भाजप आमदरांनी आणि खासदारांनी वेगवेगळे प्रकल्प आणण्याऐवजी येथील प्रकल्प बाहेर जात आहेत.ही राजकीय नेत्यांची उदासीनता आहे.भविष्यात आम्ही सोलापूरच्या भविष्यासाठी मोठं रान उठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत बाबर यांनी दिली आहे.
सोलापूरमधून हा प्रकल्प जाऊ देणार नाही. वेळ पडल्यास आम्ही आंदोलन करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प दिला असला तरी ते गप्प आहेत. आमच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी या संदर्भात आवाज उठवणार आहेत, असं प्रशांत बाबर म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
