निखिल पुष्कराज खन्ना (वय ३६) असे मृत पतीचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी रेणुका (वय ३८) हिला वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले. मयत तरुणाचे पिता पुष्कराज खन्ना यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. खन्ना दाम्पत्य आणि सासू-सासरे वानवडीतील एका सोसायटीत राहतात. निखिल यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता; तसेच ते बांधकाम व्यावसायिक होते.
निखिल आणि रेणुका यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. सप्टेंबर महिन्यात रेणुकाचा वाढदिवस होता. तिला दुबईला वाढदिवस साजरा करण्याची इच्छा होती. पती तिला दुबईला घेऊन गेला नाही; तसेच पाच नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्या वेळी पतीने मनासारखी भेटवस्तू दिली याचा तिला राग होता.
रेणुकाला डिसेंबर महिन्यात भावाच्या मुलीच्या वाढदिवसासाठी दिल्लीला जायचे होते. यावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. दोघांमध्ये शुक्रवारी दुपारी याच कारणावरून भांडण झाले.
रेणुकाने रागाच्या भरात पतीच्या तोंडावर ठोसा मारला. यामध्ये निखिल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता.
निखिल यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला होता; तसेच रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास झाल्याने निखिल यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश पाचंगे यांनी वर्तवला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Read Latest Pune Updates And Marathi News