• Sat. Sep 21st, 2024

राज्यात ९ लाखांहून अधिक बालके आजारी, जन्मजात व्यंग, कर्करोग अन्…; पालकांनो वाचा सविस्तर

राज्यात ९ लाखांहून अधिक बालके आजारी, जन्मजात व्यंग, कर्करोग अन्…; पालकांनो वाचा सविस्तर

मुंबई : राज्यात आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ या अभियानाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला नऊ लाख ६४ हजार ३८४ बालके आजारी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात जवळपास सात लाख बालकांना बाल्य आजार झाल्याची नोंद करण्यात आली असून, १३ हजार ९०५ बालकांमध्ये जन्मजात व्यंग असल्याचे आढळून आले आहे. या एकूण आजारी बालकांपैकी ९ लाख ६ हजार ८६३ बालकांवर उपचार या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राज्य सरकारतर्फे यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ या अभियानाची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून करण्यात आली होती. या अभियानाअंतर्गत राज्यातील शून्य ते १८ वर्षांपर्यंतच्या सुमारे २.६२ कोटी बालकांची आरोग्य चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्याचे आरोग्य विभागाने निश्चित केले होते. दरम्यान, या अभियानाअंतर्गत आतापर्यंत ९५ टक्के म्हणजेच दोन कोटी ४९ लाख ५४ हजार २५७ बालकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी नऊ लाख ६४ हजार ३८४ बालके आजारी असल्याचे आढळून आले आहे.

आकडे सांगतात…

– आजारी बालकांपैकी १३,९०५ बालकांना जन्मजात व्यंग

– त्यापैकी १२,३८८ जणांवर उपचार

– १,७६,९६२ बालकांमध्ये जीवनसत्त्वाची कमतरता

– त्यापैकी १,६६,९४२ बालकांवर उपचार

– ७,३४,९०८ जणांमध्ये बालकांमधील आजार

– त्यापैकी ६,९३,१० बालकांवर उपचार

– तब्बल २४,५४७ बालकांमध्ये विकासात्मक विलंब

– त्यापैकी २१,८४७ जणांवर उपचार

– किशोरवयीन १४,०६२ मुलांमध्ये विविध आजार आढळले

– त्यापैकी १२,६७६ जणांवर उपचार सुरू

३७२ बालकांना कर्करोग

या अभियाना अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत जवळपास ३७३ बालकांना कर्करोगाचे निदान झाले आहे. तर ४३१ बालकांना बालपणातील टीबीचे निदान झाले असल्याचे आढळून आले आहे. तर बालपणातील कुष्ठरोग आढळून आलेल्या बालकांची संख्या ३०४ इतकी असून ६२ हजार ९२४ जणांना त्वचारोग आढळून आला आहे.

सर्वाधिक बालकांमध्ये दातांच्या समस्या

राज्यातील जवळपास १ लाख ४० हजार १०४ बालकांमध्ये दातांचे विकार आढळून आले आहेत. तर स्वमग्नता आढळून आलेल्या बालकांची संख्या ही १ हजार ११७ इतकी आहे. तर जवळपास २१ हजार ६२५ बालकांमध्ये इतर विकासात्मक विलंबाचे आजार आढळून आले आहेत.

११ हजार बालकांवर शस्त्रक्रिया

आरोग्य विभागासाठी या अभियानासाठी एकूण ४३ हजार ७७ शिबिरे घेण्यात आली. त्यात एकूण १३ हजार ७१ बालकांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यापैकी ११ हजार ४१२ बालकांवर या अभियाना अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे.

९६ हजार शाळांमध्ये तपासणी

या अभियानासाठी १२ हजारपेक्षा अधिक पथके कार्यरत होती. त्यानुसार राज्यातील एकूण ९६ हजार ७३७ शाळांमध्ये, तर १ लाख १० हजार ४७३ अंगणवाड्यांमध्ये ही तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

वयोमानानुसार तपासणी झालेली बालके

वय बालके

० ते ६ वर्षे ७३ लाख ४ हजार ८२

६ ते १० वर्षे ६५ लाख ९० हजार ५९

१० ते १८ वर्षे १ कोटी १० लाख ६० हजार ११६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed