• Fri. Sep 18th, 2026

नागपुरात बहुसंख्य कुणबीच; जिल्हा प्रशासन लागले कामाला, दोन दिवसांत १३ हजार नोंदी तपासल्या

नागपुरात बहुसंख्य कुणबीच; जिल्हा प्रशासन लागले कामाला, दोन दिवसांत १३ हजार नोंदी तपासल्या

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्याच्या महानगर व ग्रामीण भागात कुणबी जात नोंदणीची तपासणी सुरू झाली आहे. १३ ऑक्टोबर १९६७पूर्वीच्या अभिलेखांची तपासणी केली जात आहे. तीन स्तरांवर तीन समित्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील बहुसंख्य कुणबीच असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे येथे फारशी शोधाशोध करण्याची गरज नाही. गेल्या दोन दिवसांत १३ हजार नोंदी तपासण्यात आल्या आहेत.

-मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातप्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

-या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशनमोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दृकश्राव्य माध्यमाद्वारे सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

-त्यानुसार, नागपूर विभागासाठी विभागीय समन्वय अधिकारी म्हणून उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

-जिल्हास्तरीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती, अंमलबजावणीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची समिती आणि तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

-नागपूर जिल्ह्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील अनेकांना अधीच कुणबी प्रमाणपत्र मिळाले असल्याने हा प्रश्न इथे फारसा जाणवणार नाही, असेही जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले.
कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं? त्यासाठी कोणती कागदपत्रे हवीत? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे
चार दिवसांची कालमर्यादा

महसूल पोलिस व प्रशासनाच्या अन्य शाखांची तपासणी करण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. पुढील चार दिवसांत कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात नोंदी शोधण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील प्रशासनाचा आढावा घेऊन गतीने कालमर्यादेत राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व अधिकाऱ्यांनी खसरा पत्रक, पाहणी पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे रजिस्टर, मागणी नोंदणी पत्रक, शैक्षणिक अभिलेखे, जन्म मृत्यू नोंदी, करार खत, भाडेचिठ्ठी, मृत्युपत्र, माजी सैनिकांच्या नोंदी, सेवापुस्तक, सेवा अभिलेख, सैन्य भरतीच्या वेळी घेतलेल्या नोंदी आदींची तपासणी करावी. यासंदर्भातील विभागणी कशापद्धतीने करावी, याचेही मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. पाहणीनंतर एकत्रित आकडे जाहीर करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed