• Sat. Sep 21st, 2024

अनिल देशमुखांच्या बंडखोरीची आठवण; नंतर महायुतीत सहभागी होण्याचं कारण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

अनिल देशमुखांच्या बंडखोरीची आठवण; नंतर महायुतीत सहभागी होण्याचं कारण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

नागपूर: ‘शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय कुठल्याही दबावाखाली नाही तर विचारपूर्वक घेतला आहे. २०१९मध्ये आम्ही शिवसेनेसोबत युती करू शकतो तर मग आता भाजप युतीत गेलो तर आमचे काय चुकले’, असा प्रश्न करत जनतेपर्यंत यामागची सकारात्मक भूमिका पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. आता अजितदादांचे पर्व सुरू होत असून त्याला विदर्भातील लोकांनी साथ द्यावी, असे आवाहनही तटकरे यांनी यावेळी केले. लवकरच संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात येतील. तसेच डीपीसी आणि शासकीय समित्यांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी राहतील. कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आरक्षणाची गरज का पडतीये? अस्तित्वाचे प्रश्न बाजूला, लोकशाहीचा खेळखंडोबा, मेधा पाटकर यांची सडकून टीका
राष्ट्रवादीतून एक गट वेगळा होऊन सत्तेत सहभागी झाल्याने होत असलेल्या टीकेबद्दल बोलताना तटकरे म्हणाले, ‘महायुतीत सहभागी झालो असलो, तरी आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांशी फारकत घेतलेली नाही. २०१४मध्ये विधानसभा निवडणुकींचा निकाल हाती यायचा होता. आम्ही शरद पवार यांच्याकडे बसलो. त्यावेळी आम्हाला भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला सांगण्यात आले. भाजपने पाठिंबा मागितला नव्हता. अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी काम करणे हाच यामागचा हेतू आहे.

‘राष्ट्रवादी पक्षाची विदर्भात ताकद वाढली नाही, असे सतत बोलले जाते. मात्र, त्यासाठी जे नेते कारणीभूत आहेत, त्यांनी पक्षनिष्ठा कुणाला शिकवू नये. बंडखोरी ज्यांच्या रक्तात आहे ते बंगल्यावरील नेते आम्हाला फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार शिकवायला लागले आहेत. आत्मकेंद्रित राजकारणामुळे इथे पक्ष वाढला नाही. आपली जागा निवडून आणण्यापलीकडे काही करू शकत नाही, त्यांनी अजित पवार यांच्याविषयी बोलू नये’, अशी बोचरी टीकाही सुनील तटकरे यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांचे नाव न घेता केली. काँग्रेसमधून उमेदवारी मिळाली नाही त्यावेळी १९९५मध्ये बंडखोरी करत युती सरकारमध्ये मंत्रिपद मिळवले, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

एकनाथ खडसेंच्या तब्येतीबाबत कोणतीही रिस्क घेणार नाही | रोहिणी खडसे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘घड्याळ तेच, वेळ नवी’ याअंतर्गत ‘निर्धार नव्या पर्वाचा’ हा पदाधिकारी-कार्यकर्ता या संवाद मेळावा शंकरनगरातील महाराणा प्रताप सभागृहात रविवारी झाला. त्यावेळी तटकरे बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मारावबाबा आत्राम, माजी मंत्री सुबोध मोहिते, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अविनाश काकडे, राष्ट्रीय सचिव व नागपूर निरीक्षक राजेंद्र जैन, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे, शहराध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, प्रदेश सचिव अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, युवक शहराध्यक्ष विशाल खांडेकर आदी उपस्थित होते. मेळाव्यात सूरज चव्हाण, रूपाली चाकणकर, प्रशांत पवार, अनिल अहिरकर, बाबा गुजर, राजेंद्र जैन, आभा पांडे यांचीही भाषणे झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed