प्रताप कांचन या तरुणाने तो ९६ कुळी आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको असं विधान केलं होतं. या तरुणाला सोलापूरमधील मराठा आरक्षण आंदोलकांनी उत्तर दिलं आहे. प्रताप कांचन या तरुणांच्या अंगावर मराठा बांधवांनी ऑइल टाकलं आहे.
प्रताप कांचन आणि सुनील नागणे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत कुणबी मराठा प्रमाणपत्राला विरोध केला होता. प्रताप कांचन यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून पैसे घेऊन अशा पद्धतीची विधान केली असल्याचा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांनी मनोज जरांगे पाटील गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, असं म्हटलं. इतर संघटना देखील आंदोलन करत आहेत. प्रताप कांचन आणि सुनील नागणे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असल्याचं कुणबी प्रमाणपत्र नको असल्याचं सांगितलं. त्यामुळं ऑइल टाकल्याचं राम जाधव यांनी म्हटलं.
सोलापुरातील आक्रमक मराठा बांधवांनी प्रताप कांचन या तरुणाला उठाबशा देखील काढायला लावल्या आहेत. प्रताप कांचन या तरुणाला मराठा आंदोलकांनी जाब विचारला. यावेळी प्रताप कांचनने मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांची माफी मागितली आहे.
बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण
मराठा आरक्षण आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागलेलं आहे. आज बीडच्या माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावण्यात आली. त्यानंतर माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीत देखील आग लावण्यात आली. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या घराला देखील आग लावण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय देखील पेटवण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं, जाळपोळ करु नये, असं आवाहन केलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून जाळपोळीच्या घटना घडत आहेत, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News